Salt Manufactures In Shiroda Facing Transportation Problem
Salt Manufactures In Shiroda Facing Transportation Problem

शिरोड्यातील मीठ उत्पादकासमोर `ही` अडचण 

शिरोडा ( सिंधुदुर्ग) - लॉकडाऊनचा थेट परिणाम जिल्ह्यातील एकमेव मिठागर क्षेत्र असलेल्या येथील मीठ उत्पादकांना बसला आहे. वाहतुकीअभावी तयार असलेला माल विकायचा कसा असा प्रश्‍न मीठ उत्पादकांसमोर आहे. लाखो रूपयांची हानी होण्याची भीती त्यांना सतावते आहे. 

येथील मिठागरे आणि मीठ व्यवसायाला ऐतिहासीक वारसा आहे. येथील मीठ सत्याग्रह सर्वश्रुत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आदेशाने 12 मे 1930 यादिवशी देशव्यापी मीठ सत्याग्रह झाला. येथे तो पाच ते सहा दिवस हा सत्याग्रह चालला. यामुळे इथल्या मिठागरांना वेगळे महत्व आहे. पुर्वी जिल्ह्यात मिठबाव, मालवण परिसरात बरीच मिठागरे होती. कालांतराने तेथील मिठागरे बंद पडली. तुर्तास अख्या जिल्ह्यात एकट्या शिरोड्यात मीठ उत्पादन केले जाते. 

सुमारे पंचवीस-तीस वर्षांपूर्वी येथे लहान मोठी पंधरा मिठागरे होती. कामगारांची कमतरता, मोठी आर्थिक गुंतवणूक आदी कारणांमुळे ही संख्या घटत गेली. शासकीय आणि काही खाजगी मिळून आज सात ते आठ मिठागरे चालू आहेत. 

मिठागर वसविण्यासाठी अंदाजे लाखभर खर्च येतो. प्रत्यक्ष मीठ तयार होण्यास फेब्रुवारी उजाडतो. अनुकूल वातावरण असेल तर तीन महिन्यांचा हंगाम चालतो. प्रत्येक मिठागरवाले पांढरे मीठ व काळे मीठ अशी दोन प्रकारची उत्पादने घेतात. यंदा पांढरे मीठ कमी प्रमाणात काढले गेले. पांढरे मीठ खाण्यासाठी, फॅक्‍टरी, बर्फ, मच्छी साठवण्यासाठी वापरले जाते. काळे मीठ आंबा, काजू, बागायती, भरडी बागायतीत मशागतीसाठी वापरले जाते. काळे मीठ उत्पादनाचा खर्च जास्त; परंतु दर कमी असतो. 

चालू वर्षी उत्पादन तसे सामान्य राहिले; मात्र विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शिवाय आंबा, काजू, कोकमचे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे बागायतदारांकडून खताच्या मिठाची उचल कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मिठागरात गुंतविलेल्या रक्‍कमेचा ताळमेळ कसा घालावयाचा या विवंचनेत मिठागरवाले आहेत. मीठ उत्पादक मुरलीधर गावडे यांनाही यंदा या व्यवसायात नुकसान होण्याची भिती व्यक्‍त केली. 

""यंदा वाहतुकीवरील बंदीमुळे मीठ उत्पादन व्यवसायाचा पुरा कणाच मोडला आहे. चालू वर्षी मिठागरवाल्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर कामगारांच्या कमतरतेमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला हा व्यवसाय पुढील पाच-सात वर्षात इतिहासजमा होण्याची भिती आहे.'' 
- राजन गावडे, मीठ उत्पादक, शिरोडा.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com