
चिपळूण (रत्नागिरी ) : तालुक्यातील ८३ पैकी २३ ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य दाखवण्यात आली आहे. या गावात वर्षानुवर्षे अनुसूचित जातीचे लोक वास्तव्यास असतानाही त्यांची लोकसंख्या चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली. परिणामी ग्रामपंचायत सदस्य आरक्षणावर त्याचा परिणाम झाला.
८३ ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागरचना व आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला; मात्र २०११ मधील जनगणनेतील त्रुटी अनुसूचित जाती जमातीमधील लोकांच्या संविधानिक हक्कावर गदा आणणाऱ्या ठरल्या आहेत.
२३ ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य..
तालुक्यात खेर्डी, सावर्डेसह ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये होणार आहेत. या निवडणुकींसाठी निवडणूक विभागाकडून प्रभागरचना व आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण निश्चित करताना २०११च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. त्यानुसार प्रामुख्याने अनुसूचित जाती व जमातीमधील लोकसंख्येबाबत घोळ झाला आहे. तालुक्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी वाघिवरे, दुर्गवाडी, येगाव, कुडप, खोपड, भोम, गांग्रई, कोळकेवाडी, कुशिवडे, आगवे, तिवडी, रिक्टोली, कोंडफणसवणे, अनारी, कळबंट, मुंढेतर्फे सावर्डे, उभळे आगरगाव, मालघर, शिरळ, मुंढेतर्फे चिपळूण, तळसर, वडेरू, पिलवलीतर्फे सावर्डे या गावांत अनुसूचित जातीची लोकसंख्या शून्य दाखवण्यात आली आहे. ही बाब केवळ चिपळूण तालुक्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अशा त्रुटी उघड झाल्या आहेत. यापूर्वीही लोकांनी जणगणनेवर आक्षेप घेतला होता; मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
अनुसूचित जाती जमातीवर गदा
२०११च्या जणगणनेसाठी गावनिहाय प्रगणकांच्या नेमणुका केल्या होत्या. जनगणनेत आर्थिक, कौटुंबिक, घरातील विविध साधने आदी विविध बाबींचा समावेश होता. २०११च्या जनगणनेत त्रुटी राहिल्याने अनुसूचित जाती जमातीमधील लोकांच्या हक्कावर गदा आली आहे. अनेक गावांत या ग्रामस्थांची पुरेशी लोकसंख्या असूनही त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. मंगळवारी (ता.४) ८३ ग्रामपंचायतीत ग्रामसभा झाल्या. यातील अनेक ग्रामपंचायतींत अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी दाखवल्यामुळे लोकांनी रोष व्यक्त केला. काही गावांत थेट आरक्षण पद्धत चुकीचे असल्याचे ठराव केले आहेत. ७ फेब्रुवारीला आरक्षण जाहीर होणार असून, १४ पर्यंत त्यावर हरकती नोंदवता येणार आहेत. नोंदवलेल्या हरकती संबंधितांना सिद्धही कराव्या लागणार आहेत.
हेही वाचा- कोयना धरण परिसरात भूकंपाचा सोम्य धक्का -
प्रशासनानेच न्याय द्यावा..
जनगणनेत अनुसूचित जाती जमातीमधील लोकांच्या हक्कावर गदा आणली. कुशिवडेत अनुसूचित जातीची सुमारे २५० लोकसंख्या असताना ती शून्य दाखवण्यात आली. बौद्ध, नवबौद्धांची नोंदणी खुल्या गटात झाली. त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत. यावर प्रशासनानेच तोडगा काढून न्याय द्यावा.
- सिद्धार्थ कदम, सरपंच कुशिवडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.