

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - निसर्गाचे देणे, परंपरा, संस्कृती यांचे देणे लाभलेला मुलूख म्हणजे तळकोकण. कोकण म्हटलं, की पार मुंबईपासून सिंधुदुर्गापर्यंतचा भाग आपल्या डोळ्यासमोर येतो. यातही तळकोकणातील सिंधुदुर्गाने आपली ओळख, वेगळेपण जपली आहे. अगदी भाषेपासून, राहणीमानापर्यंत आणि आहारापासून रूढी, परंपरांपर्यंत सर्वच गोष्टी न्याऱ्या आहेत.
या भागाला संपन्न असा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत, आरमारात, स्वातंत्र्य लढ्यात सिंधुदुर्ग नेहमीच आघाडीवर राहिला आहे. त्या भागाला मागासलेला भाग म्हणून नेहमीच हिणवले जाते; मात्र येथील वैभव टिपणारी दृष्टी असलेल्यांना सिंधुुदुर्गासारखा वैभवसंपन्न भाग जगात सापडणार नाही. येथील परंपरा, या भागाचा इतिहास, मालवणी माणसाची मानसिकता, निसर्गाने भरभरून दिलेली संपन्नता इतर कुठे सापडणे तसे दुरापास्तच आहे.
या भागाविषयी जाणून घेताना आधी त्याचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. आताचे कोकण प्राचिनकाळी हिंदुस्तान देशाच्या दक्षिण भागात असलेल्या दख्खन किंवा महाराष्ट्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्राचा भाग होते.
या भागाचा इसवीसन पूर्व 73व्या वर्षीपासूनचा इतिहास सापडतो. त्याकाळी या भागावर आंध्रभृत्य घराण्याची सत्ता होती. इ. स. वि. स. न. पूर्व 73व्या वर्षी या घराण्यातील सिमुक राजा गादीवर आला. त्यावेळी राजधानी पैठणला होती. यांनाच शातवाहन किंवा शालीवाहन म्हणतात. इ. स. वि. स. न 40 मध्ये शालिवाहनांचे उच्चाटन करून शक राजांचा अंमल सुरू झाला; मात्र 133 मध्ये शालिवाहन घराण्यातील गौतमीपुत्र शातकर्णी या राजाने शकांचा पराभव करून पुन्हा सत्ता मिळवली. याच काळात कोकणात व्यापाराला भरभराट आली. त्यावेळी आताच्या सिंधुदुर्गातील कोचरा, निवती, आचरा, बांदा ही समुद्र खाडी लगतची गावे व्यापारीपेठा बनली. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड हे या काळात सर्वात मोठे बंदर होते.
याच काळात शालिवाहन राजाचा प्रधान गुणाढ्य याने "पैशाची' भाषेत "बृहत्कथासागर' हा ग्रंथ लिहिला. याच काळात शप्तशती, कातंत्र्यव्याकरण आदी ग्रंथ प्रसिद्ध झाले. या वेळपासूनच या भागात साहित्य निर्मितीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाल्याचे मानले जाते. इ.स. वि. स. न 300च्या दरम्यान शालिवाहनांचा अंमल जावून पुन्हा शकांचे राज्य आले; मात्र या शतकाच्या अखेरीस राष्ट्रकूट घराण्याचा उदय झाला. पुढे 600च्या सुरवातीच्या काळात राष्ट्रकुट राजांचा पराभव करून चालुक्य राजांनी सत्ता मिळवली. 752 मध्ये चालुक्य राजा किर्तीवर्मा याचा अंमल होता. राष्ट्रकुट घराण्यातील राजा दंतीदुर्ग याने त्याचा पराभव करून वर्चस्व मिळवले.
याच दरम्यान दक्षिण कोकणात शिलाहार राजांचा उदय झाला. या घराण्याचा मूळपुरूष असलेल्या शणफुल्ल याच्यावर तत्कालीन राष्ट्रकूट राजा कृष्णराज याचा विशेष स्नेह होता. त्याने शणफुल्ल याला सह्याद्री पर्वत आणि समुद्र यामधील जमिन पट्ट्यावरील सत्ता दिली होती. राष्ट्रकूट घराण्यातील शेवटचा राजा दुसरा कर्क याचा 973 मध्ये तैलप या चालुक्य राजाने पराभव केला. याच पूर्वीच्या चालुक्य घराण्याशी काही संबंध असल्याचा उल्लेख मात्र कुठे आढळत नाही.
राष्ट्रकूट घराण्याची सत्ता असेपर्यंत कोकणावर शिलाहार घराण्याचीच सत्ता होती. त्यांच्या पाडावानंतर त्यांनी चालुक्य राजाचे मांडलीकत्व स्वीकारले. पुढे 1189 मध्ये देवगिरीच्या यादव घराण्याने सत्ता मिळवली. पुढे जलाल्लुद्दीन खिलजी या मुस्लीम राजाने 1300 मध्ये यादवांचा पराभव केला. विजयनगरच्या हिंदू राजांनी पुढे हा प्रांत आपल्या अधिपत्याखाली आणला.
विजयनगर राज्याचा विस्तार मोठा होता. राज्याची घडी नीट बसावी, यासाठी त्यांनी विभागवार नायक किंवा पाळेगार यांची नियुक्ती केली. त्यावेळी आताच्या सिंधुदुर्गातील बऱ्याच भागाचा कुडाळ प्रांतातून कारभार पाहिला जात असे. या प्रांतातील कुडाळ देशस्थ प्रभू म्हणजे हे पाळेगार असल्याचे मानले जाते. पंधराव्या शतकात बाहमती राजांचा अंमल सुरू झाला. यानंतर मराठे आणि मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू झाला.
याच दरम्यान विजापूरमध्ये 1489 मध्ये आदिलशहाने गादीची स्थापना केली. 1500 मध्ये गोव्याचा सुभेदार युसुफ याने आदिलशहाला आपला राजा मानला. यामुळे कोकणावर आदिलशहाचा अंमल सुरू झाला. बादशाही आमदनीत बांधलेल्या काही इमारती, मशिदी आजही आहेत. यात बांद्यातील रेडेघुमट बैलघुमट यांचा समावेश आहे. शिवाय कुडाळमधील घोडेबांवही याच काळातील आहे.
- (संदर्भ - सावंतवाडी संस्थानचा इतिहास ः विठ्ठल पुरुषोत्तम पिंगुळकर)
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.