सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा; नव्या व्यवस्थेत किल्लेकोट नामशेष

सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा
सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणाsakal

ब्रिटीशांनी (British) कारभार हातात घेतल्यानंतर राजवाड्यात असलेल्या नोकरचाकरांची संख्याही कमी केली. सगळ्यात मोठा बदल केला तो किल्ले, कोट यांच्या व्यवस्थेत. तेथे कार्यरत बहुसंख्य सैन्य, तोफा (Military) व इतर युध्द (War) साहित्य अन्यत्र हलवले. सावंतवाडीसाठी (Savantwadi) स्वतंत्र फलटण नेमली. यामुळे किल्ले, कोट (Sindhudurg Fort) यांचे महत्त्व नाहीसे झाले. ते जवळपास नामशेषच झाले.

सावंतवाडी संस्थानच्या रचनेत कोट आणि किल्ल्यांचे महत्त्व मोठे होते. हे कोट, किल्ले तेथे नियुक्त सरदार किंवा किल्लेदार यांच्यामार्फत चालत असत. यावर संस्थानचे अर्थात राजाचे नियंत्रण असायचे. बहुसंख्य कोट, किल्ले फोंडसावंत उर्फ आनासाहेब यांच्या कारकिर्दीत बांधल्याचे संदर्भ या आधीच आले आहेत.

सावंतवाडी संस्थानच्या वैभवकाळात सावंतवाडी, कुडाळ, बांदा, वेंगुर्ले, आवाडे, डिचोली, हळर्ण हे सात कोट आणि सिदगड, महादेवगड, नारायणगड, हनुमंतगड, निवती, भरतगड, यशवंतगड, नगरसिंहगड असे आठ किल्ले होते. या कोटांच्या आणि किल्ल्यांचा खर्च त्याच्या आजुबाजूच्या भागातील वसुल करातून केला जात असे. त्याला तनखा असे म्हटले जात असे. याशिवाय संस्थानच्या तिजोरीतूनही काही नेमणूक असायची.

पुढच्या काळात बहुतेक कोट, किल्ले शत्रूंनी बळकावले. १८३२ पर्यंत सावंतवाडी, कुडाळ, बांदा, आवाडे हे चार कोट आणि हनुमंतगड, नारायणगड व नरसिंहगड हे तीन किल्ले सावंतवाडी संस्थानकडे होते. हळूहळू या किल्ल्यावरील वस्तीही कमी झाली होती. नारायणगड व नरसिंहगड हे किल्ले जवळजवळ मोकळे होते.

Summary

सावंतवाडी शहरात कोटाच्या बंदोबस्तासाठी तसेच राजवाड्यात इतर कामांसाठी नोकरचाकर व सैनिक होते. याला शहरपन्हा असे म्हणायचे.

याशिवाय सावंतवाडी शहरात कोटाच्या बंदोबस्तासाठी तसेच राजवाड्यात इतर कामांसाठी नोकरचाकर व सैनिक होते. याला शहरपन्हा असे म्हणायचे. बंदोबस्तासाठी परवानगीच्या दरवाजावर १०, छपावणीच्या कट्ट्यावर ७, तंबाखूच्या दुकानात ६, मासळीच्या तिठ्यावर ७, बंदीवान लोकांच्या रखवालीसाठी २६, तटाच्या निरनिराळ्या बुरूजावर ७, नगारखान्याजवळ १३, काळ्या बुरूजावर ११, ब्राह्मण बुरूजावर ६, महालाच्या दारावर १०, माजघरात जामदारखान्याकडे ७, चौकीवर ४३, सालई दरवाजावर ११, काजीची दिंडी भागात ११, कोलगाव दरवाजावर ७, दिंडी सबनीस येथे ६, दिंडी कारिवडे ५, दिंडी खासकीलवाडा ११, मुशीचा दरवाजा, पाटणकरांची दिंडी, पागेचा दरवाजा, सदरेचा दरवाजा, थोरले सदरेवर, हनुमंतांच्या देवळाजवळ मिळून २८६, निरोप पोहचवण्यासाठी ११, गस्तीवर ५० आदी मिळून ५६९ जण कामाला होते. या सर्वांवर सेनापतीचे नियंत्रण असायचे. त्यांच्या नेमणुका, शिक्षा करणे, राजेसाहेबांच्या हुकुमाची अमंलबजावणी करणे हे सर्व सेनापती करत असत. याशिवाय आवश्यकता भासेल त्याप्रमाणे ३० ते ५० जण तसेच तहसिलदारांच्या कारकुनाकडे १५० पर्यंत लोक सेनापतींनी उपलब्ध करून द्यावेत असा नियम होता.

शहरपन्हा ही एक व्यवस्था होती. या सर्वजणांची पहाटे नौबतीच्यावेळी हजेरी घेतली जायची. या सगळ्याचा रिपोर्ट सेनापतींकडे जात असे. शहरात त्या काळात रोज रात्रीच्यावेळी तोफ उडवण्याची पध्दत होती. त्यानंतर पहाटेची नौबत होईपर्यंत सेनापतींची विशेष परवानगी घेतल्याशिवाय शहरात कोणी फिरू नये किंवा बंदूकिचा आवाज काढू नये असा नियम होता.

ब्रिटीशांनी कारभार हातात घेतल्यानंतर ही सर्व व्यवस्था बदलायला सुरूवात केली. हळूहळू माणसे कमी केली. गरज पडेल तेव्हा बोलावणे पाठवण्याच्या अटीवर घेतलेल्या सैनिकांना इतर नोकऱ्या दिल्या. किल्ल्यांवरील तोफा व इतर युध्द साहित्य अन्यत्र हलवले. सावंतवाडीसाठी स्वतंत्र सैन्याची अर्थात फलटणीची व्यवस्था उभी केली. या सगळ्या बदलांमुळे संस्थानमधील किल्ले, कोट जवळपास नामशेष झाले.

अशी होती शिक्षण व्यवस्था

सावंतवाडी संस्थानच्या काळात राज घराण्यातील मुले, दरकदार, मेहमान, सरदार यांच्या मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यात सरकारमार्फत एक शाळा चालवली जायची. इतर लोक आपल्या सोयीप्रमाणे पंतोजी (शिक्षक) ठेवून मुलांना शिक्षण देत असत. विशेषतः ब्राह्मण समाजातील लोकांमध्ये पंतोजी ठेवून शिक्षण देण्याची पध्दत होती. बालबोध, मोडी वाचन, गणित, हिशोब असाच या काळात अभ्यासक्रम असायचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com