चिपळूण : ड्रोनद्वारे वाशिष्ठीचे होणार सर्वेक्षण; मुख्य अभियंता विजय गोगरे

बोगदा खोदून जगबुडीचे पाणी वळवणार; नदीच्या पात्राची खोली वाढवणार
चिपळूण : ड्रोनद्वारे वाशिष्ठीचे होणार सर्वेक्षण; मुख्य अभियंता विजय गोगरे

चिपळूण : चिपळूणच्या पूरसंरक्षणासाठी (chiplun flood protection)जलसंपदा विभाग पुण्यातील ‘सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन’ (CWPRS) या संस्थेची मदत घेणार आहे. वाशिष्ठी नदीतील(vashishthi river)बेटे काढणे सध्या शक्य नाही. त्यामुळे इतर पर्यायांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा उपयोग करून नदीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे (jagbudi river)चिपळूणच्या दिशेने येणारे पाणी बोगदा काढून इतर ठिकाणी वळवणे शक्य आहे का, याची चाचपणी केली जाणार आहे. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय गोगरे(vijay gogre) यांनी याबाबतची माहिती दिली.

चिपळूण शहराच्या पुराला कारणीभूत ठरणाऱ्या वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय गोगरे यांच्यावर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या आठवड्यात श्री. गोगरे हे चिपळूणला आले होते. त्यांनी वाशिष्ठी नदीत सुरू असलेल्या गाळ उपसा कामाची पाहणी केली. त्यानंतर मेरीटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी वाशिष्ठी नदीतील बेटांची पाहणी केली. कोळकेवाडी ते करंबवणेपर्यंत वाशिष्ठी नदीत १४ बेट आहेत. ही बेटे काढण्यासाठी १४२ कोटींची गरज आहे. मात्र, मेरीटाईम बोर्डच्या नकाशावर या बेटांची कांदळवन म्हणून नोंद आहे. ही बेटे पूर्वीपासूनची आहेत की नव्याने तयार झाली आहेत, हे तपासण्यासाठी १९५६ चे ब्रिटिशकालीन नकाशे तपासण्यात आले. त्यामध्येही या बेटांची कांदळवन म्हणून नोंद आहे. त्यामुळे ही बेटे काढायची झाल्यास जलसंपदा विभागाला न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागेल.

दिवा बेटावर आदळते

खेडच्या दिशेने येणाऱ्या जगबुडी नदीच्या पाण्याला प्रचंड उतार मिळतो. त्यामुळे हे पाणी वेगाने चिपळूणच्या दिशेने सरकते आणि दिवा बेटावर आदळते. त्यामुळे हे बेट काढणे गरजेचे आहे. मात्र, या बेटाला कांदळवनाचे संरक्षण मिळाल्यामुळे खेडच्या दिशेने येणारे पाणी बोगदा काढून अन्य ठिकाणी वळवणे शक्य आहे का, याची चाचपणी जलसंपदा विभाग करणार आहे. सीडब्ल्युपीआरएस संस्थाची मदत घेतली जाणारआहे.

वाशिष्ठीतील बेट काढणे अशक्य

वाशिष्ठी खाडीत एकूण १४ बेटे आहेत. यातील बहूतांशी बेटे ही कांदळवनाची निगडीत आहेत. १९५६ पासूनच्या नकाशावर या बेटांची कांदळवन म्हणून नोंद आहे. त्यामुळे ही बेटे काढण्याचा निर्णय जलसंपदाने घेतला असला तरी कायदेशीररित्या ते जलसंपदा विभागाला शक्य नाही. त्यामुळे ही बेटे काढली जाणार नाहीत, हे मेरीटाईम बोर्डाने स्पष्ट केले आहे.

‘सीडब्ल्यूपीआरएस’ म्हणजे काय

पाणी आणि जलविद्युत क्षेत्रात भरीव काम करणारी देशातील महत्त्वाची संस्थाम्हणून ‘सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन’ म्हणजेच ‘सीडब्ल्यूपीआरएस (खडकवासला)’ला ओळखले जाते. जल आणि जल अभियांत्रिकी या क्षेत्रांत या संस्थेने १०० वर्षे भरीव योगदान दिले आहे. १९६१ मध्ये तत्कालीन बॉम्बे प्रेसिडन्सीतर्फे स्पेशल इरिगेशन सेल या नावाने संस्थेचा जन्म झाला.त्यानंतर १९३६ मध्ये संस्थेतर्फे सिंचनासह पूरनियंत्रण आदी क्षेत्रांतही काम हाती घेण्यात आले.

एक नजर....

  1. कोळकेवाडी ते करंबवणेपर्यंत वाशिष्ठी नदीत १४ बेटे

  2. मेरीटाईमच्या नकाशावर बेटांची कांदळवन म्हणून नोंद

  3. १९५६ चे ब्रिटिशकालीन नकाशेही तपासण्यात आले

  4. बेटे काढण्यास जलसंपदाला जावे लागेल न्यायालयीन प्रक्रियेतून

  5. ड्रोनच्या सहाय्याने केले जाईल नदीचे चित्रीकरण

  6. नदीचा होणार अभ्यास; पुढील उपायोजना केली जाणार

  7. नदीत पाण्याच्या मार्गातील इतर अडथळे शोधले जातील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com