वर्षअखेरीपर्यंत तिलारीचे पाणी सातार्ड्यात 

tilari dam water issue satarda kokan sindhudurg
tilari dam water issue satarda kokan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या बांदा कालव्यातून वाफोलीपर्यंत पाणी पोहोचले आहे. आता ओटवणेपर्यंत आणि नंतर आठ दिवसात इन्सुलीपर्यंत पाणी पोहोचणार आहे. या वर्षभराच्या शेवटपर्यंत पाणी सातार्ड्यापर्यंत पोहोचेल, अशी माहिती माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आज दिली. 
आमदार केसरकर यांनी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. शेतकऱ्यांच्या विषयावर तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्याबाबत भूमिका मांडली.

ते म्हणाले, ""तिलारी प्रकल्पाचा बांदा ते रोणापाल कालवा काम जलद गतीने काम सुरू आहे. मी पालकमंत्री असताना दोन वर्षापूर्वी या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. उन्हाळ्यामध्ये बांदा, ओटवणेपर्यंत पाणी सोडले जात होते. ते आता 19 मार्चला सोडले आहे. वाफोलीपर्यंत पोहोचले आहे. ओटवणे भागात पाणी पोहोचले. आता नेतर्डे, बांदा, वाफोली, विलवडे, ओटवणे, सरमळे अशा भागांना पाणी मागणीनुसार पुरवठा करण्यात येणार आहे.'' 

ते म्हणाले, ""ओटवणे ते इन्सुली गावातील कालवा मार्गावर दगड व घरे आहेत. त्यामुळे कंट्रोल ब्लास्टिंग करून काम युद्धपातळीवर सुरू असून या भागात कालवा काम लवकरच होईल. त्यामुळे येत्या आठ दिवसात इन्सुलीत पाणी पोहोचेल. रोणापालमध्ये लवकरच पाणी जाईल. साताड्यापर्यंत वर्षाच्या शेवटपर्यंत पाणी देण्यासाठी कालवा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांना बांधापर्यंत पाणी देण्यासाठी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प हा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाइपद्वारे पाणी देण्याचे नियोजन आहे. या अनुषंगाने कामे जलद गतीने सुरू आहे.'' 

ते म्हणाले, ""आता शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनाच्या नियोजनाची कामे करणे गरजेचे आहे. कृषी उत्पादन घेऊन त्याची बाजारात किंवा पिकेल तेथे विकेल अशा योजनेचा लाभ घेतला पाहिजे. तिलारी प्रकल्पाचे कालवा विभागाचे काम वेगाने सुरू असून पाणी दिले जाणार आहे; मात्र काही ठिकाणी श्रेयासाठी शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन उभारून आपणच पाणी आणल्याचा दिखावा दर्शवणारा बेबनाव सुरू आहे. शेतकऱ्यांनी जागृत होऊन याकडे लक्ष दिले पाहिजे. पीक उत्पादन घेऊन शेतकऱ्यांनी समृद्धी आणावी.'' 

ते म्हणाले, ""जिल्ह्यातील सर्व जलसंपदा प्रकल्पांना यापूर्वी निधी मिळवून दिला आहे. सर्वात जुना तिलारी प्रकल्प आहे. आता या प्रकल्पाचे पाणी शेवटचा टप्पापर्यंत पोहोचेल. याचा आपणास आनंद असून आपल्या मतदारसंघात प्रकल्प असल्याने माझ्या प्रयत्नांना यश आले आहेत. 

कालवा दुरुस्ती गरजेची 
केसरकर म्हणाले, की गोवा राज्यात जाणाऱ्या प्रकल्पाचे कालवे हे जुने आहेत. ते काही ठिकाणी नादुरुस्त आहेत. त्यामुळे या कालव्यावर कोणी खर्च करावा असा प्रश्‍न येतो. गोव्याला 73ः30 तर महाराष्ट्राला 26ः70 प्रमाणे फायदा व खर्च केला जातो. त्यानुसार कालवा दुरुस्तीसाठी गोव्याने निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे दुरुस्तीबाबत पावसाळ्यापूर्वी प्रयत्न केले जातील. गोव्यात जाणाऱ्या पाण्याचे कालवे फुटत आहेत. ते फुटू नयेत म्हणून दुरुस्ती करणे गरजेचे आहे. 

उत्तम स्टील प्रकल्पालाही पाणी 
सातार्ड्यापर्यंत या वर्षाच्या शेवटपर्यंत पाणी पोहोचेल. येथील उत्तम स्टील प्रकल्प चालकांना संपर्क साधला असून प्रकल्प सुरू झाल्यास याठिकाणी पाणी मिळेल आणि रोजगार उपलब्ध होईल. याकडे प्रकल्प चालकांचे लक्ष वेधले आहे, असेही आमदार केसरकर म्हणाले. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com