
बांद्यातील स्टॉलधारकांचे पुनर्वसन करा
73253
सावंतवाडी ः नायब तहसीलदार लता वाडकर यांना निवेदन देताना बाळू सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, रत्नाकर आगलावे व सिद्धेश नाईक.
(छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
बांद्यातील स्टॉलधारकांचे पुनर्वसन करा
ग्रामस्थांची मागणी ः सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः येथे होणाऱ्या उड्डाणपुलामुळे रस्त्यालगत असलेली दुकाने व स्टॉल हटविण्यात येणार असल्याने शेकडो कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यासाठी दुकानदारांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विचार करत त्यांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सावंतवाडी तहसीलदार यांना देण्यात आले.
तहसीलदार महेश उंडे उपस्थित नसल्याने नायब तहसीलदार लता वाडकर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, रत्नाकर आगलावे, शामसुंदर धुरी, सिद्धेश नाईक आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, बांदा येथे प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी लगतच्या स्टॉलधारकांना दुकाने काढण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गेली अनेक वर्षे शेकडो युवकांनी या ठिकाणी स्टॉलची उभारणी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, आता स्टॉल काढण्यात येणार असल्याने या युवकांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या स्टॉलधारकांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचे योग्य जागी पुनर्वसन करावे. दरम्यान, नायब तहसीलदार वाडकर यांनी ग्रामस्थांचे म्हणणे वरिष्ठांना सादर करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.