
महापुराच्या संकटाचे संधीत रूपांतर करणे आवश्यक
लेख क्र..४
इंट्रो
यापूर्वी शहरात २६ जुलै २००५ ला महापूर आला होता. या महापुरानंतर अनेक तर्कवितर्क लढवले गेले, अनेक भीती निर्माण केली गेली. कालांतराने सर्व काही शांत झाले; परंतु २२ जुलै २०२१ पुन्हा महापूर आला. होत्याचे नव्हते झाले. लोकांचे घरगुती सामान, जीवनावश्यक वस्तू वाहून गेलेल्या आहेत. ४ हजार ७१७ व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिपळुणात सुमारे ११ हजार ८०५ घरांचेही कमी-जास्त नुकसान झाले आहे. २१२ गोठे, १५० टपरी व हातगाड्या, ५ हजार ९९५ दुचाकी व चारचाकींचे नुकसान झाले आहे. ११ जण मृत्युमुखी पडले. १२५ गायी, ३११ म्हशी, ३३८ बकरी-बोकड, १० घोडे, ४८ गाढवे, १३० वासरे, ४५ बैल व रेडे व ४४५३ कोंबड्या मरण पावलेल्या आहेत. यासोबत एकूण सुमारे २३०० कोटींच्यावर सर्वांचे नुकसान झाले आहे. १५० दिवस फक्त घरातील व दुकानातील चिखल काढण्यात गेले; पण सर्वात मोठे नुकसान शहरात परत बसवणे, व्यापार रोजगार उपलब्ध करणे हे मोठे आवाहन आहे. या पुरामुळे चिपळूण पुराचे शहर ओळखू जावे लागले; पण चिपळूणकरांनी खचून जाता कामा नये. आलेल्या संकटाचे संधीत रूपांतर केले पाहिजे व पर्याय शोधले पाहिजेत.
- शाहनवाज शाह, जलदूत
स्थापत्य अभियंता, चिपळूण
---
महापुराच्या संकटाचे संधीत रूपांतर करणे आवश्यक
चिपळूण शहर हे बशीच्या आकाराचे असून, त्याच्या चहूबाजूने डोंगर, सह्याद्रीच्या रांगा आहेत व यामधून पोफळी घाटमाथा येथून एक, कोळकेवाडी येथून व खेड तालुक्यातील चोरवणे पोसरे पंधरा गाव या बाजूने, अडरे, अनारी या भागातून टेराव धामणवणे तसेच तिवरेतिवडी या दसपटी भागातून अशा विविध भागांतून उपनद्या मिळून एक वाशिष्ठी तयार होते. पुढे शहरात आल्यावर कामथे भागातून शिवनदी, पुढे कलावंडे या भागातून तसेच वेगवेगळ्या भागातून उपनद्या येऊन या नदीला मिळतात. पुढे खेड तालुक्यातील सर्व भागांतून अशाच पद्धतीने सर्व उपनद्यांना एकत्र घेऊन जगबुडी नदी येऊन मिळते. या नदीत सुमारे २२३३ चौरस किलोमीटर परिसरातील पाणलोट क्षेत्राचे पाणी येते.
या नदीवर पोफळी येथील घाटमाथा क्षेत्रातील पोफळी येथील दोन दिशा बदल धरणे, कोळकेवाडी येथील ३६.५२, तळवट येथील ६.६५, तिवरे २.४५, अडरे ३.४२४, मोरावणे ३.८४, खोपड १.८६३, कलावंडे १.९७, फणसवाडी १.४०८, शेल्डी १.७४९ द.ल.घ.मी. क्षमतेची धरणे आहेत. पुढे जगबुडी नदी व तिच्या पाणलोट क्षेत्र व तिच्यावर असणाऱ्या व येथे असणारे चाटव, पोयनारमी कशेडी, लाटण, कुड्प कोळथरे, मिरवणे या धरणांचा व या प्रभागातील पाणलोट क्षेत्राचा भरतीच्या काळात अप्रत्यक्षपणे फार मोठा परिणाम वाशिष्ठीवर व पर्यायाने चिपळूण शहरावर व खेर्डी भागावर होतो. या नदीमध्ये येणारा पूर हा वाशिष्ठीमधून ३६७५ घ.मी./से., शिवनदी ८१३ घ.मी./से. व कोयना विद्युतनिर्मितीमधून ३२० घ.मी./से. येणारे एकूण पुराचे काळातील पाणी, ४८०८ घ.मी./से. पुराचे काळातील पाणी व २००५ पूर्वीची या नदीची पूरवहन क्षमता हा ९५७ घ. मी./से.होती. ही क्षमता पुढे वाढवणे फार गरजेचे होते; पण याच काळात ती सुमारे ४० टक्के अधिक कमी झाली आहे.
जैवविविधता व नैसर्गिक बदलाकरिता नदीला पूर आलाच पाहिजे. हा पूर थांबवता निश्चित येत नाही; पण नियंत्रणाखाली आणणे गरजेचे आहे. सध्या जे महापूर येत आहेत ते मानवनिर्मित आहेत. मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणामुळे येत आहेत. त्याचा दोष निसर्गाला अजिबात देता येणार नाही. आपण प्रथम पाहिले, तर सह्याद्रीचे डोंगर हे प्रतिदिन बोडके, उघडे होत चाललेले आहेत. जे जुने-मोठे वृक्ष होते ते व सरसकट सर्व झाडे तोडली जात आहेत जी जुनी झाडे होती. त्याची पाळेमुळे अगदी खोल खडकापर्यंत किंबहुना खडकांना छेदून खोलवर गेलेली दिसून येतात. ही पाळेमुळे जमिनीला व पाण्यालाही धरून ठेवतात तसेच येथे असणारे गवत हेही जमिनीची धूप धरून ठेवते. गवत उन्हाळ्यात जरी सुकले तरी पहिल्या पावसात ती लगेच पुनर्जीवित होतात; परंतु ठिकठिकाणी वणव्यांमुळे त्यांची बीजे ही जळून जातात. पुन्हा नव्याने दुसरीकडून येणारे बीज रूजेपर्यंत थोडा कालावधी जातो.
वनविभागाच्या नियमानुसार जंगल हे एकूण क्षेत्राच्या ३३ टक्के असले पाहिजे; परंतु उपलब्ध आकडेवारीनुसार आपल्याकडे ०.७५ टक्के जंगल शिल्लक आहे. त्यामुळे जंगलतोड ही पूर्णपणे थांबवली गेली पाहिजे व अभ्यासपूर्ण वृक्ष लागवड केली पाहिजे, तसेच नियमानुरूप ३२.२५ क्षेत्र हे धोरणात्मक निर्णय करून कोणत्याही मार्गाने क्षेत्र जंगलाकरिता आरक्षित केले पाहिजे. झाडतोडीचा कायदा हा फार कडक करणे गरजेचे आहे. चिपळूण परिसर पुरापासून वाचवावयाचे असेल तर समस्त चिपळूणवासीयांना सर्व काही विसरून जंगलतोंडीविरोधात मोठे जनआंदोलन उभारावे लागेल.
संपूर्ण चिपळूण तालुक्यातील पाणलोट क्षेत्राचा विचार करता असणाऱ्या धरणांची संख्या ही फार कमी आहे. ही संख्या वाढवता येईल का ? याचाही विचार होणे गरजेचे आहे. पोफळी येथील जे जलदिशा बदल करत बांधलेले धरण आहे. या धरणातूनच वाशिष्ठीचा एक उगम होतो. या धरणाचा वापर आता जलसाठा करून मगच ते पाणी फिरवण्यात यावे. तिवरे धरणात जलसाठा अजिबात होत नाही. याही धरणाचा गाळ काढून त्याची डागडुजी करून येथे हा जलसाठा होणे गरजेचे आहे.
चौकट
दगडगोट्यांबाबत निर्णयाची अपेक्षा
विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या डोंगर उत्खननास महसूल खात्याने पूर्णपणे बंदी आणणे गरजेचे आहे. फळबाग लागवड ही डोंगराच्या नैसर्गिक उतारावरच झाली पाहिजे. याच फळबागाकरिता म्हणू स्वतः अथवा कृषिखात्याकडून शेततळे खोदली जातात. ही शेततळी तेथील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन भूगर्भ शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊनच खोदली गेली पाहिजेत. कोयना धरणाचे व पाणी स्थलांतरित करण्याकामी मोठमोठे बोगदे खणण्यात आले. या बोगद्यातून निघालेले दगडगोटे हे नदी व वहाळांच्या बाजूने फार मोठ्या प्रमाणात साठे करून ठेवलेले आहेत. २२ जुलै २०२२ ला कोळकेवाडी बोगद्याजवळ वरील बाजूस ठेवलेला साठ्यामधील हजारो ब्रास दगडगोटे या बोगद्याच्या मुखाशी आले व येथील विद्युतनिर्मिती बंद पडली. आता या वाशिष्ठी व उपनद्यांच्या किनारी ठेवलेले हे दगडगोटे अतिवृष्टीच्या काळात वाहून शेवटी या नदीपात्रात येतच आहेत. यामधून शासनाला उत्पन्न काय आहे हा संशोधनाचा विषय आहे. याऐवजी या दगडगोट्यांबाबत संबंधित खात्याचे मंत्री यांनी त्वरित निर्णय घेऊन या दगडगोट्यांचा लिलाव करून टाकावा जेणेकरून शासनाला उत्पन्नही मिळेल व नदी प्रवाहात येऊन पात्राची खोली कमी होणार नाही व ही खोली वाढवण्याकरिता पुन्हा खर्चही होणार नाही.