
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना
rat३०१७.txt
( पान २ अॅंकर)
rat३०p१०९.jpg -
79174
चिपळूण ः शहरातील धामणवणे (पिटलेवाडी) येथील माघी उत्सवातील उजळलेले वातावरण.
तेजाकडे नेणाऱ्या अभंग,ओव्यासंगे दीपोत्सव
धामणवणे पिटलेवाडीतील भारलेपण ; माघी उत्सवाचे वैशिष्ट्य
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण,ता.३० ः शहराचाच भाग असलेल्या मात्र विंध्यवासिनीपासून थोड्या दूरवर डोंगराच्या पायथ्याशी धामणवणे (पिटलेवाडी) येथे झालेल्या माघी गणेशोत्सवातील दीपोत्सव नेत्रसुखद होता. शिवाय तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ही प्रार्थना जणू प्रत्यक्षात चेथे उतरली अशा तऱ्हेचे भारलेले वातावरणही होते. गरीब, श्रीमंत, मालक, नोकर असे कुठचेही भेदाभेद औषधालाही नव्हते. भक्तांचा उत्साह आणि दीप प्रज्वलित झाल्यानंतरही भारून टाकणारी शांतता हे या उत्सवाचे जणू वैशिष्ट्यच ठरले.
या उत्सवाची अनुभूती घेणाऱ्या संध्या साठे-जोशी यांनी सांगितले की, माघी उत्सवाच्या सायंकाळी धामणवणे (पिटलेवाडी) येथे जाण्याचा योग हा अंतरीचा दिवाही प्रज्वलित करणारा ठरला. त्या म्हणाल्या की, देवळात दिंडी चालली होती. स्त्री-पुरुष फेर धरून नाचत होते. तेही छान मनमोहकच दृश्य होतं. त्यानंतर एका बाजूला हरिपाठ म्हणणारे वारकरी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांचे अभंग म्हणण्यात तल्लीन झाले होते. दुसरीकडे सभामंडपाच्या मध्यभागी एका विशिष्ट रचनेत काही पाट मांडले गेले. त्यावर मेणबत्त्या उभ्या केल्या गेल्या. दोन स्टॅन्डवर पणत्या मांडल्या होत्या. चार शुभ्र वस्त्रांकित स्त्रिया हातात कागद घेऊन त्या पाटांसमोर आसनस्थ झाल्या. सभामंडपातील दिवे मालवले गेले आणि अज्ञानाचा, मोहाचा अंधःकार नाहीसा होवो, अशा अर्थाच्या ज्ञानेश्वरीतील ओव्या एकापाठोपाठ एक संथ सुरात म्हटल्या जाऊ लागल्या. उपस्थित प्रत्येकाच्या हातात प्रज्वलित मेणबत्ती देऊन ज्योतीने ज्योत चेतवत पाटांवरील मेणबत्त्या, स्टॅन्डवरील पणत्या, सभामंडपाच्या चहूबाजूच्या पणत्या प्रज्वलित करत स्त्री-पुरुष रांगेने गाभाऱ्यात जाऊन गणपतीला ओवाळून हातातल्या पणत्या तुळशी वृंदावन आणि आणखी एक दोन ठिकाणी नेऊन ठेवत होते.
ज्ञानेश्वरीतील ओव्या संपून गणपतीचा गजर सुरू झाला होता. उपस्थित प्रत्येकाची प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत हा गजर चालू होता.
''आम्ही लावियेला कैवल्याचा दीप
अंधाराचे रूप पालटले''
या ओळींचा जीवंत अनुभव. शंभर-दोनशे लोकांच्या त्या समुदायात जसे उच्चशिक्षित लोक होते तसेच मोलमजुरी करणारे कष्टकरी लोकही होते; पण त्या क्षणी ते एका समान सुत्रात गोवले गेले होते.
---
महिलाना आधी .........
सोपानदेव चौधरींच्या, ''उच्च नीच आता येथे नाही भेदाभेद नव्या मानवी धर्माचा मुखे गात वेद'' या ओळींची प्रचिती येत होती. महत्वाचं म्हणजे कुठेही गडबड गोंधळ, बेशिस्तपणा नाही. सगळा शिस्तशीर कारभार. भोजन प्रबंधातसुद्धा आधी लहान मुलं आणि अभ्यागत, मग स्त्रिया आणि शेवटी पुरुष अशी व्यवस्था होती. महिलांची आधी पंगत ही सुद्धा एक पाऊल पुढे म्हणावे अशी बाब. पुढच्या काही वर्षात हा उत्सव चिपळूणवासीयांचे वैशिष्ट्य ठरेल, असे मत संध्या साठे जोशी यानी व्यक्त केले.
--