
माकडताप रोखण्यासाठी यंत्रणा अलर्ट
माकडताप रोखण्यासाठी यंत्रणा अलर्ट
सर्वेक्षण सुरू; ४६ रक्तजल नमुने निगेटीव्ह
कुडाळ, ता. १ ः डिगस येथे केएफडी बाधीत गोचिड सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. त्यांनी संशयास्पद ताप रूग्णांचे ४६ रक्तजल नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठवले; मात्र त्यात एकही बाधीत रूग्ण सापडला नसल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. तरीही पूर्ण सतर्कता बाळगली जात आहे.
जिल्ह्यात साधारण नोव्हेंबरमध्ये केएफडीमुळे होणाऱ्या माकडतापाची साथ डोके वर काढते. गेली काही वर्षे या आजाराने जिल्ह्यात थैमान घातले होते; मात्र गेली दोन वर्षे स्थिती नियंत्रणाखाली होती. ऐन काजू हंगामाच्या तोंडावर डिगस येथे केएफडी बाधीत गोचिड सापडल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत तालुकानिहाय सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. सर्व्हेक्षणा दरम्यान डिगस या गावातील गोचिड केएफडी बाधित आढळून आल्या होत्या. सदयस्थितीत या भागात तापरुग्ण सर्व्हेक्षण सुरू आहे. यात एकही तापरुग्ण आढळलेला नाही. आरोग्य विभागामार्फत तालुक्यात संशयित केएफडी रुग्णांचे एकुण ४६ रक्तजल नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था पुणे येथे तपासणी साठी पाठविण्यात आले. तपासणी अंती एकही रुग्ण बाधित आढळून आलेला नाही, अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
दरवर्षी नोव्हेबर ते जून या कालावधीत जिल्ह्यामध्ये सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यामधील काही गावांमध्ये माकडताप (क्यासनूर फॉरेस्ट डिसीज) या आजाराची लागण होण्यास सुरवात होते. या बाधित भागात रुग्णवाढ अथवा साथउद्रेक उद्भवू नये यासाठी यंत्रणा सतर्क झाली आहे. संभाव्य संशयित रुग्ण शोधण्यासाठी नियमित ताप रुग्ण सर्वेक्षणासह संभाव्य बाधित क्षेत्र निश्चित करण्यासाठी गोचिड संकलन करण्यात येत आहे. विशेष ताप रुग्ण सर्व्हेक्षण करून आढळलेल्या तापरुग्णाच्या रक्तनमुन्याची संशयित रुग्ण म्हणुन तपासणीच्या सूचना संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राना दिल्या आहेत. या भागात आढळलेल्या तापरुग्णांचे केएफडी, डेंगी, चिकुनगुनिया या आजाराच्या निदानासाठी रक्तजल नमुने एनआयव्ही पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी आवश्यक ते नियोजन केले आहे. सर्व्हेक्षणा दरम्यान घरोघरी जावून या आजाराबाबत आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे. आढळलेल्या तापरुग्णांना त्वरीत शासकिय दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी आवश्यक औषधसाठा व किटकनाशके उपलब्ध करूदिले आहेत. वनविभाग, ग्रामपंचायत विभाग, पशुसंवर्धन विभाग या सर्व विभागांच्या सहकार्याने व समन्वयाने संवेदनशील भागात रुग्णवाढ होवू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.