
परीक्षेच्या ताणतणावाविषयी जनजागृती
परीक्षेच्या ताणतणावाविषयी जनजागृती
१ फेब्रुवारी ते ३० एप्रिल ; डॉ. अतुल ढगे होणार सहभागी
रत्नागिरी, ता. ४ ः गाव तिथे मानसोपचार अंतर्गत ''परीक्षेला सामोरे जाताना'' या घोषवाक्यासह विविध शाळा, कॉलेजमध्ये तसेच विविध गटांमध्ये जाऊन मनोविकारतज्ञ डॉ. अतुल ढगे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या ताणतणावाविषयी १ फेब्रुवारी ते ३० एप्रिलदरम्यान जनजागृती करणार आहेत.
राज्यभरातील समविचारी मानसोपचार तज्ञांनी एकत्र येऊन गाव तिथे मानसोपचार- राज्यव्यापी मनस्वास्थ्य जनजागृती अभियान या समाजप्रबोधनपर उपक्रमाची सुरवात केलेली आहे. गाव तेथे मानसोपचार या अंतर्गत अनेक मानसोपचारतज्ञ स्वतः पुढाकार घेऊन सामुदायिक पातळीवर विविध कार्यक्रम घेत असतात. ज्यामध्ये शाळा, महाविद्यालये, विविध संस्था या ठिकाणी चर्चासत्र आयोजित करणे, जागरूकता अभियान राबवणे, गावपातळीवर आणि वस्ती पातळीवर कॅम्प घेणे, समाजातील तरुणांना व्यसनमुक्तीबद्दल मार्गदर्शन करणे अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात.
परीक्षेचा तणाव ही सामान्य बाब झाली असून, परीक्षेच्या ताणतणावामुळे मुलांमध्ये व तरुणांमध्ये नैराश्याचे व आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. हे लक्षात घेऊन पाचव्या टप्प्यात परीक्षेला सामोरे जाताना या घोषवाक्यासह विविध शाळांमध्ये जाऊन राज्यभरात जनजागृतीचा प्रयत्न केला जाणार आहे. इंडियन सायकियाट्रिक सोसायटी (वेस्टर्न झोन) व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या सहयोगाने जवळपास ४०० मानसोपचार तज्ञ या मोहिमेत सक्रिय काम करणार आहेत. शाळा किंवा कॉलेजमध्ये हा कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास आपल्या जवळच्या मनोविकातज्ञाशी संपर्क करण्याचे आवाहन मनोविकारतज्ञ व इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम. ए.) रत्नागिरी शाखेचे सचिव व आय.एम.ए. (महाराष्ट्र) च्या मानसिक आरोग्य कमिटीचे सहअध्यक्ष डॉ. अतुल ढगे यांनी केले आहे.
---
अस्वस्थता आणि तणाव
परीक्षेची जास्त चिंता एखाद्या व्यक्तीच्या माहिती शिकण्याच्या आणि आठवण्याच्या क्षमतेमध्ये व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे परीक्षेतील गुण कमी होतात आणि शैक्षणिक कामगिरी कमी होते.
--