राजापूर ःभुयारी मार्ग की जंक्शन हा मुद्दा अनुत्तरित

राजापूर ःभुयारी मार्ग की जंक्शन हा मुद्दा अनुत्तरित

Published on

फोटो ओळी
-rat९p६.jpg ः KOP23L81511 राजापूर ः डेपोसमोर महामार्गाचे काम अर्धवटच आहे.
-----------
महामार्गाचा विकासात खो ............. लोगो

भुयारी मार्ग की जंक्शन हा मुद्दा अनुत्तरित
राजापूर शहराची व्यथा ; डेपोसमोरील रस्ता रखडलेला
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः राजापूर एसटी डेपोसमोरील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग न करता जंक्शन करावे अशी काहींनी मागणी केली आहे तर, काहींनी जोपर्यंत या ठिकाणी भुयारी मार्ग होत नाही तोपर्यंत चौपदरीकरणाचे काम करू नये, अशी आक्रमक भूमिका काहींनी घेतली आहे. मात्र, भुयारी मार्ग की जंक्शन हा मुद्दा अद्यापही अनुत्तरित आहे. या ठिकाणच्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीमध्ये राहिले आहे. त्यामुळे या ठिकाणी ‘भुयारी मार्ग की जंक्शन’ नेमकं ठरणार कधी याची साऱ्यांना प्रतीक्षा आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे तालुक्यामध्ये वाटूळ ते तळगाव असा सुमारे ३७ किमीचे चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यापैकी बहुतांश काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावरील सर्वाधिक उंचीचा पूलही वाहतुकीसाठी खुला झाला आहे; मात्र डेपोसमोरचा रस्ता ‘भुयारी मार्ग की जंक्शन’ याच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे एसटी डेपोसमोरील भागामध्ये भरधाव वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. त्याचवेळी या ठिकाणी या मार्गाला क्रॉस करीत एसटी डेपोमध्ये सातत्याने एसटी गाड्या जा-ये करतात. त्या परिसरातील लोकांचीही या रस्त्यावरून नेहमीच वर्दळ असते. या परिसरात बाजारपेठेचाही मोठा विस्तार झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग असावा असे काहींचे म्हणणे आहे तर काहींचे या ठिकाणी जंक्शन व्हावे असे मत आहे. मात्र, त्याबाबत अद्यापही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यावर योग्य तो तोडगा काढून पावसाळा थांबल्यानंतर रखडलेल्या या भागातील रस्त्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, सद्यःस्थितीमध्ये तशा कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे रखडलेले हे काम सुरू होणार की जैसे थे स्थितीमध्ये राहणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

चौकट ः १
सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय

रत्नागिरीकडून गोव्याच्या दिशेने जात असताना डेपोसमोर पुलावरून खाली आलेला उतार संपल्यानंतर गतीरोधक टाकण्यात आला आहे. मात्र, तो अर्धवट असल्याने अनेक दुचाकीचालक स्पीडब्रेकरवरून जाण्याऐवजी ज्या ठिकाणी तो संपतो तेथे कट मारून जातात. मात्र, या सार्‍या कसरतीमध्ये अनेक दुचाकी चालक घसरून पडले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने तेथे योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

चौकट ः २
प्रवासी निवारा शेड आवश्यक
राजापूर एसटी डेपोसमोरून मुंबई-गोवा महामार्ग जातो. डेपोसमोर मोठ्या संख्येने प्रवाशी थांबलेले असतात. मात्र, या ठिकाणी प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांना ऊन आणि जोरदार पावसात तासनतास उभे राहावे लागत आहे. चौपदरीकरणात गावोगावी प्रवासी निवारा शेड उभारल्या जात असताना एसटी डेपोसमोर ती उभारण्याचे कोणतेही नियोजन दिसत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.