तीन वर्षांपूर्वीच्या मृत्यूचा नव्याने तपास

तीन वर्षांपूर्वीच्या मृत्यूचा नव्याने तपास

Published on

तीन वर्षांपूर्वीच्या मृत्यूचा नव्याने तपास
मठ-कोल्ह्याचे भाटले येथील प्रकरणः चौकुळमधील एकावर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ९ः तीन वर्षांपूर्वी झालेल्या मठ येथील तिलोत्तमा सावंत यांच्या मृत्यूप्रकरणी आता नव्याने तपास होणार आहे. हा आकस्मिक मृत्यू नसून तो खून असल्याचा संशय असल्याने त्या दृष्टीने तपास करण्याचे आदेश वेंगुर्ले न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. न्यायालयीन आदेशानुसार पोलिसांनी संशयित सुधीर ऊर्फ बाबल्या बाळू गावडे (रा. चौकुळ, सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अॅड. मनीष सातार्डेकर आणि अॅड. सागर ठाकूर यांनी युक्तिवाद केला.
याबाबत अधिक माहिती अशी, मठ-कोल्ह्याचे भाटले येथील तिलोत्तमा सावंत या आपल्या घरी एकट्याच राहत होत्या. त्यांचे तीन मुलगे कामानिमित्त मुंबईला राहत असत. 1 ऑगस्ट 2019 ला तिलोत्तमा यांचा त्यांच्या राहत्या घरी संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. या घटनेची पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती. तिलोत्तमा यांचा मृत्यू होण्यापूर्वी दोन दिवस आधी सुधीर उर्फ बाबल्या गावडे हा त्यांचा एक दूरचा नातेवाईक त्यांच्या घरी येऊन राहिला होता. याबाबत त्याने तिलोत्तमा यांच्या तीनपैकी एकाही मुलाला कोणतीच कल्पना दिलेली नव्हती; मात्र 14 ते 15 वर्षांनंतर अचानक येऊन राहिलेल्या सुधीर याचे वागणे संशयास्पद वाटत असल्याची माहिती तिलोत्तमा यांनी मुंबईतील अनंत, श्रीकृष्ण आणि संदीप या आपल्या तिन्ही मुलांना दिली होती. आईचा मृत्यू झाल्यानंतर घरी दाखल झालेल्या मुलांना तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे आढळून आले होते. तिलोत्तमा यांच्या गळ्यावर नखांचे ओरखडे होते. तर गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ व पैसे असलेली उशी चोरीला गेल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे आपल्या आईचा सोने व पैशांसाठी खून झाला असल्याची तक्रार अनंत यशवंत सावंत यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांकडे केली होती. त्यांनी योग्य ती दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त करीत जिल्हा पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार केली होती; मात्र त्यांच्याकडूनही न्याय न मिळाल्याची तक्रार करीत वेंगुर्ले न्यायालयात संशयितावर गुन्हा दाखल होण्याबाबतचा अर्ज दाखल केला गेला होता. या प्रकरणी वेंगुर्ले न्यायालयात झालेल्या सुनावणीत फिर्यादीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून तिलोत्तमा यांचा मृत्यू आकस्मिक नसून खून झाल्याचा संशय निर्माण होत असल्याचे मत व्यक्त करीत न्यायाधीश के. के. पाटील. यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

कोट
ही घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेची पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती. संशयित आरोपी सुधीर ऊर्फ बाबल्या गावडे याने तिलोत्तमा यांचा खून केल्याचे कोणतेही पुरावे अद्यापपर्यंत आढळलेले नाहीत. कोर्टाच्या आदेशानुसार याबाबत अधिक तपास सुरू आहे.
- अतुल जाधव, पोलिस निरीक्षक, वेंगुर्ले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.