
उपवडेवासीयांची जीवघेणी कसरत थांबणार
swt१०३.jpg
८१७३७
उपवडेः येथे आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
उपवडेवासीयांची जीवघेणी कसरत थांबणार
पुलासाठी साडे तीन कोटीः आमदार नाईकांचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः माणगाव खोऱ्यातील अतिदुर्गम असलेल्या उपवडे गावात पुलाअभावी ग्रामस्थांची गैरसोय होत होती. मात्र, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून नाबार्ड योजने अंतर्गत उपवडे येथील पूलासाठी ३ कोटी ३४ लाख मंजूर केले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या कामाचे आज आमदार नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. हे पुल मंजूर झाल्यामुळे उपवडेवासीयांची जीवघेणी कसरत आता थांबणार आहे.
गेली अनेक वर्षे पावसाळ्यात याठिकाणच्या कमी उंचीच्या आणि जीर्ण झालेल्या जुन्या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने वाहतूक बंद होऊन गावाचा संपर्क तुटत होता. या पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून ३ जणांचा मृत्यू झाला होता. उपवडे येथील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थांनी आमदार नाईक यांच्याकडे नवीन पुलाची मागणी केली होती. मात्र, पुल बांधणीसाठी तांत्रिक अडचणी येत होत्या. परंतु, आमदार नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून राज्यामार्फत नाबार्डकडे या पुलाचा प्रस्ताव पाठवून दुकानवाड ते उपवडे रस्त्यावर उपवडे येथे पूल मंजूर करून घेतले. त्यासाठी नाबार्ड योजने अंतर्गत ३ कोटी ३४ लाख मंजूर झाले आहेत.
आमदार नाईक म्हणाले, ‘‘कोणत्याही ठेकेदारासाठी किंवा कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर लोकांची उपयुक्तता आणि गरजेनुसार विकास कामे मंजूर करत आलो आहे. उपवडे गाव छोटा असला तरी पुलाच्या भूमिपूजनासाठी गावातील सर्वजण आले. यातून पुलाची गरज दिसून येते. असाच पुळास गावात साकव गरजेचा होता तो पूर्ण केला. आंबेरी येथील पूल देखील पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी पावसाळ्यात लोकांची अडचण होणार नाही. मतदारसंघात जी महत्वाची कामे आहेत, ती येत्या वर्षभरात मार्गी लावली जाणार आहेत.’’ यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, राजू कविटकर, रमाकांत ताम्हणेकर, श्रेया परब, कृष्णा धुरी, रामा धुरी, सरपंच अजित परब, उपसरपंच सदानंद गवस, गणपत परब, पुळास सरपंच निकम, बाळकृष्ण दळवी, विश्राम दळवी, संतोष राऊळ, महादेव राऊळ, गोपाळ सावंत, सखाराम पालकर, कृष्णा गवस, अनंत नाईक, विष्णू भरडे, दिनकर म्हाडगूत, महेंद्र राऊळ, यशवंत कदम, संतोष सावंत, सचिन पालकर, तुषार परब, श्रीकृष्ण नेवगी, पिंटू उबारे, प्रियांका परब, सुरेखा बांदेकर, दीक्षा तवटे, निवास कारुडकर, मीनाक्षी राऊळ, श्रीकृष्ण परब, कृष्णा पंदारे, दीपक नाईक, अरविंद राणे, आनंद शेडगे, वनिता सावंत अजित परब आदी उपस्थित होते.
चौकट
स्थगित कामांसाठी प्रयत्नशीलः नाईक
झाराप तिठा ते माणगाव तिठा या रस्त्यासाठी साडेपाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. लवकरच हे काम सुरु होईल. दुकानवाड येथील पूल देखील मंजूर करण्यात आला आहे. परंतु, सरकार बदलल्यामुळे काही कामांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे ते काम सुरु झाले नाही. ही स्थगिती उठविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे यावेळी आमदार नाईक यांनी सांगितले.