रत्नागिरी-थकित कर्जाच्या वसुलीसाठी जप्ती नको

रत्नागिरी-थकित कर्जाच्या वसुलीसाठी जप्ती नको

फोटो ओळी
-rat10p22.jpg-KOP23L81773 रत्नागिरी ः आंबा बागायतदारांच्या प्रश्‍नासंदर्भात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत.
--------------
थकित कर्जाच्या वसुलीसाठी जप्ती नको
पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश ; आंबा बागांचा वीजपुरवठा खंडीत न करण्याची सुचना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १०ः आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या त्या तीन महिन्याचे व्याज आणि पुनर्गठीत कर्जाच्या पहिल्या वर्षांचे व्याज माफ करण्याचा प्रस्ताव तयार बनविण्यासाठी बँकांकडून कर्जदार बागायतदारांच्या याद्या तयार केल्या जाणार आहेत. तोपर्यंत बँकांनी बागायतदारांना थकित कर्ज वसुलीसाठी जप्तीची कारवाई करू नये. तसेच शेती पंपाच्या थकित बिलापोटी वीज पुरवठा कापू नये, अशी सुचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
आंबा बागायतदारांच्या प्रश्‍नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंग, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्यासह आंबा बागायतदार प्रदीप सावंत, टी. एस. घवाळी, बावा साळवी, प्रसन्न पेठे, डॉ. विवेक भिडे, कृषी अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता, पणन मंडळ सरव्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे २०१५-१६ साली आंबा बागायतींचे मोठे नुकसान झाले होते. बागायतदारांना मदत देण्यासाठी तत्काळ सर्व्हेक्षणाच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. जिल्ह्यातील सर्वच आंबा बागायतदारांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून दिला गेला होता. त्यावेळी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्याचे व्याज आणि बागायतदारांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठनावरील पहिल्या एक वर्षाचे व्याज शासनाने माफ केले. परंतु बँकांकडून त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही झाली नव्हती. याचा आढावा जिल्हाधिकाऱ्‍यांनी घेतला. तेव्हा महसूल विभागाने यादी दिली नसल्याचे बँकांकडून सांगण्यात आले. तसेच बागायतदारांनी फॉर्म भरुन द्यावा असे सांगितले. यावर बागायतदारांनी प्रत्येक बँकांनी कर्जदार शेतकर्‍यांची यादी आम्हाला द्या, जेणेकरुन तीन महिन्याचे व्याज आणि पुनर्गठीत कर्जावरील वर्षभराचे व्याज याचा एकत्रित जिल्ह्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल. हा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत पाठवला जाईल. तशी यादी देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी बँकांना दिले असून 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत थकित बागायतदारांवर बँकांकडून होणारी जप्तीची कारवाई तात्काळ थांबवावी अशाही सुचना दिल्या. जे बागायतदार पैसे भरण्यास तयार आहेत, त्यांना मुदत द्या असेही सांगितले. त्यामुळे कारवाईमुळे त्रस्त झालेल्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.
महावितरणने वीजबिल वसुलीसाठी आंबा पिक हे अदर अ‍ॅग्रीकल्चर या प्रकारात समाविष्ट केले आहे. त्यामुळे कोकणातील मुख्य पीक असलेल्या आंबा, काजूला मोठा फटका बसला आहे. अनेक बागायतदारांनी घेतलेल्या कृषी पंपांची वीजबिले अडीचशेवरुन दहा हजारापासून लाखावर गेली. थकलेली बिले वसुलीसाठी महावितरणकडून वीज जोडण्या कापण्यास सुरवात केली. हा विषय मार्गी लागणार असल्याने महावितरणने वीज जोडण्या कापू नयेत असे निर्देश मुख्य अभियंत्यांना दिले.
--------------
चौकट
फुलकीडीवर संशोधन करा
आंब्यावर उद्भवणाऱ्‍या फुलकीडीचा त्रासावर कायम उपाययोजना करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करावे आणि उपाय सुचवावेत अशी मागणी बागायतदारांनी केली आहे. तसेच रानटी जनावरांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाकडून नेमलेल्या उपसमितीद्वारे प्रयत्न केले जात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. होणाऱ्‍या नुकसानीपोटी मदत देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com