
राजापूर-शेतकऱ्याबरोबरच शेतशिवारेही तहानलेलीच
फोटो ओळी
- rat२p२०.jpg ः KOP२३L८६३२१
राजापूर ः पाणी कमी अन् पाण्याअभावी कोरडा परिसर जास्त दिसत असलेले तळवडे धरण.
--------
धरणे आणि विकास---भाग २--लोगो
शेतकऱ्याबरोबरच शेतशिवारेही तहानलेलीच
कालव्यांचे कामे रखडली ; पाणीसाठा मृतवत, पाणी ना शेतीला ना, प्यायला
राजेंद्र बाईत ः सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः तालुक्यातील अनेक धरणांची कामे पूर्ण होऊन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला दिसत आहे. मात्र, या धरणांच्या कालव्यांची अद्यापही कामे झालेली नाहीत. काही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झाला असून, त्यामध्ये पाणी कमी अन् गाळ जास्त असे विचित्र चित्र दिसत आहे. काही धरणांच्या बांधकामांना पाणीपुरवठ्यापूर्वी गळती लागली आहे. काही धरणांच्या कालव्यांची कामे सुरू आहेत. मात्र, त्या कामांमध्ये म्हणावा तितकासा वेग दिसत नाही. त्यामुळे काही मोजक्या गावांमधील शेतकऱ्याचा अपवाद वगळता धरणांमधील या पाणीसाठ्याचा उपयोग ना शेतीसाठी होतो ना पिण्याच्या पाण्यासाठी.
तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पासह चिंचवाडी धरण (पांगरे), चव्हाणवाडी (ताम्हाणे), काकयेवाडी, वाटूळ, वाळवड (मूर), ओझर, तळवडे, झर्ये, पाचल दिवाळवाडी, परूळे, सौंदळ बारेवाडी, कोंड्ये, जुवाठी, कशेळी, गोपाळवाडी आदी धरणांची कामे पूर्ण झालेली आहे. सद्यःस्थितीमध्ये या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झालेला दिसत आहे. काही धरणांची उभारणी केवळ त्या परिसरामध्ये पाणी जिरवण्यासाठी आणि जमिनीखाली नैसर्गिक जलस्रोत वाढवण्याच्या उद्देशाने झाला असला तरी काही धरणांमधील पाणीसाठा कालव्यांच्या माध्यमातून जलशिवारांना देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी काही धरणांच्या बांधकामे पूर्ण झाली असली तरी त्यांच्या कालव्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. काही धरणांमधील पाणी परिसरातील गावांना पुरवण्यासाठी कालवे काढण्याची कामे सुरू आहेत. मात्र त्या कामाला म्हणावी तशी गती आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या धरणांमध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग ना शेतीला होतो ना पिण्यासाठी. रखडलेले भूसंपादन, लोकांचा विरोध, शासनाकडून निधीची तरतूद अन् उपलब्धतता आदी विविध कारणे कालव्याची कामे अपूर्ण असल्याची कारणीभूत आहेत.
-----
चौकट
धरणांमध्ये पाण्यापेक्षा गाळ जास्त
कालवे काढण्याचे काम रखडलेले असताना दुसर्या बाजूला काही धरणांमधील पाण्याचा प्रत्यक्षात उपयोग होण्यापूर्वी ती गाळाने भरली आहेत. त्यामध्ये पाणी कमी अन् गाळ जास्त दिसत आहे. या धरणांतील कालव्यांची कामे पूर्ण होऊन भविष्यामध्ये धरणातील पाणीसाठ्याचा उपयोग होण्यासाठी आणखीन काही वर्ष जाणार आहेत. त्यामुळे ज्या धरणांची कामे पूर्ण होऊन पाणीसाठा झाला आहे त्या धरण्यांच्या कालव्यांची कामे वेगाने होणे गरजेचे आहे.