
कवडीमोल दराने काजूची खरेदी ः बबन साळगावकर
९११८८
४८८८८
कवडीमोल दराने काजूची
खरेदी ः बबन साळगावकर
शासनाने हमीभाव देणे आवश्यक
सावंतवाडी, ता. २४ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही एजंट-खरेदीदारांकडून संघटितपणे काजूचा दर पाडून खरेदी केला जात आहे. त्यामुळे येथील काजू बागायतदारांचे नुकसान होत असून शासनाने काजूला योग्य हमीभाव द्यावा; अन्यथा काजू स्वतः खरेदी करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. या विरोधात संघटित होण्याची गरज व्यक्त करत काजू कवडीमोल दराने विकू नये, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
साळगावकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, कोकणातील प्रमुख उत्पन्न असलेल्या काजूला योग्य हमीभाव मिळत नाही. सध्याच्या काजू हंगामात शेतकऱ्यांचा काजू कवडीमोल दराने खरेदी केला जात आहे. कोकणच्या काजूची पत एक नंबरची असून तो इतरांपेक्षा चविष्ट आहे. हा काजू देशामध्ये चांगला काजू म्हणून ओळखला जातो; परंतु येथे काही जणांकडून संघटितरित्या दर पाडून काजू खरेदी केला जात आहे. त्यामुळे येथील शेतकरी बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी बागायतदारांना न्याय मिळण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तेथील लोकप्रतिनिधी सतर्क राहतात. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना प्रत्येक उत्पन्नाचा हमीभाव मिळत असतो; परंतु कोकणात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असूनही हमीभाव मिळत नाही, ही शोकांतिका आहे.
---
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
इथल्या तिन्ही आमदारांनी तसेच खासदारांनी यात वेळीच लक्ष घालावे व शेतकऱ्यांना हमीभाव मिळून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी आंबा, काजू बागायतदारांचा प्रश्न कधी सहभागृहामध्ये लावून धरल्याचे दिसलेले नाही. त्यामुळे शासनानेच याची दखल घेऊन बागायतदारांना हमीभाव द्यावा किंवा काजू स्वतः खरेदी करावा, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो.