रत्नागिरी ः सत्ताबाह्य केंद्र चालवतय रत्नागिरी पालिका

रत्नागिरी ः सत्ताबाह्य केंद्र चालवतय रत्नागिरी पालिका

रत्नागिरी पालिका ः KOP23L94932

सत्ताबाह्य केंद्राकडून रत्नागिरी पालिकेचा कारभार

महाआघाडीचा आरोप; विकासकामांत जाणीवपूर्वक खो, पाणी योजनेकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः रत्नागिरी पालिकेचा कारभार सत्ताबाह्य केंद्र चालवत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांच्याबरोबर जे गेले नाहीत, त्यांची विकासकामे जाणीवपूर्वक रखडवली जात आहेत. दुसरीकडे पक्षाची ताकद वाढण्यासाठी आणि लाभार्थ्यांची पोटं भरण्यासाठी खिरापत वाटल्याप्रमाणे कामे दिली जात आहेत. शहरात रस्ते करून दोन वर्षेही झाली नाहीत तोवर ९६ कोटीच्या काँक्रिटीकरणाची चार कामे काढण्यात आली आहेत. ही कामे थांबवून तो निधी शीळ धरणाच्या मजबुतीकरणाकडे वळवावा. पाणीयोजनेची हायड्रोलिक चाचणी करावी, याबाबत येत्या काळात कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा महाआघाडीचे प्रदीप उर्फ बंड्या साळवी, मिलिंद कीर यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रसेच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बंड्या साळवी म्हणाले, ‘शहरातील रखडलेल्या विकासकामांबाबत महाविकास आघाडीची चार दिवसांपूर्वी व्यंकटेश हॉटेलमध्ये बैठक झाली. आमदार राजन साळवी यांच्यासह तिन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील काही प्रभागामध्ये जाणीवपूर्वक कामे रखडून ठेवली जात असल्याचे दिसून आले. याबाबत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज पालिका प्रशासक तुषार बाबर यांची भेट घेतली.
शहरात सर्वत्र विकासकामे होत असताना प्रभाग क्र. ११ मधील २४ लाख ५० हजाराचे रस्त्याचे काम रखडवले आहे. कामाची निविदा निघून दोन वर्षे झाली. त्याचे ते अजून न झाल्याने कामाची मुदत संपुष्टात आली. हे रस्त्याचे महत्वाचे काम काहीनी थांबवले आहे. प्रभाग क्र. ८ मध्येही ६ लाखाचे काम घेण्यात आले होते. त्याचीही तीच परिस्थिती आहे. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होऊन अजून २ वर्षे झालेली नाहीत. रस्त्याला ३ वर्षांची हमी असताना नादुरुस्त रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्या आधीच नवीन ९६ कोटीच्या काँक्रिटीकरणाचे काम घेण्यात आले आहे. त्यापेक्षा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या मजबुतीसाठी ९६ कोटीचा निधी वळवावा, अशी मागणी प्रशासकांकडे करण्यात आली.
२०११ला पालिकेवर ३२ कोटींचा बोजा होता, आता पालिकेवर ७० कोटींच्या वर बोजा गेला आहे. त्यामुळे भविष्यात ज्याची सत्ता येईल, त्याला ही देणी भागवताना नाकीनऊ येणार आहेत. विकासकामे करण्याची संधीच मिळणार नाही. त्यामुळे विकासकामांसाठी जो १५ टक्के निधी म्हणजे १५ कोटी रुपये पालिका फंडातून वापरले जाणार आहेत. तो पैसा पाणी योजनेसारख्या विकासकामांवर वापरावा. शहरात सुधारित पाणीयोजना सुरू झाली; परंतु या योजनेची हायड्रोलिक चाचणी करण्यापूर्वीच ठिकठिकाणी पाईपलाईन फुटत आहे. या चाचणीसाठी ६ कोटी रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे देण्यात आले आहेत. ही चाचणी झाल्याशिवाय पाणीयोजना पालिकेने ताब्यात घेऊ नये, अशी मागणी आम्ही केली, असे मिलिंद कीर यांनी सांगितले.
या वेळी राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, बशिर मुर्तुझा, शहराध्यक्ष नीलेश भोसले तर शिवसेनेचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, प्रमोद शेरे आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी अनुपस्थिती दाखवली.

चौकट--
माजींच्या घरात कर्मचाऱ्यांचा राबता
शहरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असताना काही माजी नगरसेवकांच्या घरात पालिकेचे स्वच्छता कर्मचारी हजेरी लावून राबत असल्याची गंभीर बाब आमच्या निदर्शनास आली आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना माहिती देऊन तत्काळ हे प्रकार थांबवण्यास सांगितले आहे, अशी माहिती बंड्या साळवी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com