हंगामाच्या मध्यात कामगारांना माघारी पाठविण्याची वेळ

हंगामाच्या मध्यात कामगारांना माघारी पाठविण्याची वेळ

हंगाम मध्यात कामगारांना माघारी जाण्याची वेळ


आंबा बागायतदार ; उत्पादनात मोठी घट, वाशीत २० हजार पेट्या दाखल

रत्नागिरी, ता. २ ः वातावरणातील बदलांमुळे यंदा हंगामाच्या मध्यात हापूसची आवक कमीच आहे. त्यामुळे सध्या कोकणातून मुंबईतील वाशी बाजारात अवघा १७ ते २० हजार पेट्या पाठविल्या जात आहेत. आवक कमी असल्याने पाच डझनच्या पेटीला साडेतीन हजार रुपये दर मिळत असून गतवर्षीच्या तुलनेत हा दर थोड अधिक आहे. अनेक बागायतदारांनी हंगामाच्या मध्यातच कामगारांना माघारी पाठविण्यास सुरवात केली आहे.
वातावरणाने दगा दिल्यामुळे यावर्षी हापूसचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घटलेले आहे. कोकण कृषी विद्यापिठाच्या अहवालानुसार १५ टक्केच उत्पादन शेवटपर्यंत हाती येणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्‍या पंधरवड्यापासून आंबा कमी झाला. त्याचा परिणाम सर्वात मोठ्या वाशी बाजारपेठत दिसून आला. ऐन हंगामात म्हणजेच मार्च महिन्यात ५० हजारापर्यंत प्रतिदिन आंबा पेटी कोकणातून जात होती. ती ३५ हजारापर्यंत आली. अक्षयतृतीयेला यंदा सर्वात कमी नोंद झाली. ही घट अजूनही सुरुच आहे. शुक्रवारी (ता. २८) वाशीला कोकणातून १७ ते २० हजाराच्या दरम्यान पेट्या पाठविल्या जात आहेत. अन्य आंब्याचे कर्नाटकसह अन्य राज्यातून येणाऱ्‍या आंब्याच्या पेट्यांची संख्या ६५ हजारावर आहे. त्याच आंब्याचे कोकणच्या हापूसपुढे आव्हान आहे. हापूसच्या दर्जेदार फळाच्या पाच डझनच्या पेटीला साडेतीन हजार रुपये दर मिळतोय. उर्वरित छोट्या फळांना त्यापेक्षा कमी दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूसचा दर पाचशे रुपयांनी अधिक आहे. हा दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसल्यामुळे खवय्यांची पंचाईत झाली आहे.
आंबा हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात अनेकांना रोजगार मिळतो. यामध्ये स्थानिक लोकांबरोबरच नेपाळींचाही समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात बागांच्या रखवालीची कामे नेपाळी करतात. त्यानंतर औषध फवारणी, झाडे हलवणी, बागा सफाई यासह आंबा काढणी, पेट्या भरणे आणि वाहतूक अशी कामे कामगारांकडून करवून घेतली जातात. यावर्षी उत्पादन प्रचंड कमी असल्यामुळे सुरवातीला बागांमध्ये आलेल्या कामगारांपैकी सत्तर टक्के लोकांना माघारी पाठवण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे. ऐन मध्यातच हा निर्णय घ्यावा लागला. उत्पादन कमी असल्याने येणाऱ्‍या उत्पन्नातून खर्च भागवणे शक्य नसल्याचे बागायतदार सांगत आहेत. याबाबत आंबा बागायतदार बंड्या साळवी म्हणाले, आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोळा हजार पेट्या पाठविण्याचे नियोजन करणाऱ्‍या बागायतदाराच्या हाती सध्या तीन हजार पेट्याच येतील. त्यासाठीही मोठा खर्च करावा लागत आहे.
----
कोट
हापूसची आवक अजुनही कमी आहे, त्यामुळे दर स्थिर आहेत. आवक १० मे नंतरच वाढेल. तोपर्यंत अन्य राज्यातून येणाऱ्‍या आंब्याची आवकही कमी राहील. त्यामुळे हापूसचा दर जैसे थे राहील.
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com