चिपळूण जिल्ह्यात कामगार टंचाई निर्माण होणार

चिपळूण जिल्ह्यात कामगार टंचाई निर्माण होणार

rat2p19.jpg
99927
चिपळूणः रस्ता दुरुस्तीच्या कामावर असणारे कर्नाटकातील कामगार.
------------------
जिल्ह्यात कामगार टंचाई निर्माण होणार
कर्नाटकमधील निवडणूक; बेळगावचे कामगार माघारी परतले
चिपळूण, ता. २ः कर्नाटक राज्यात निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्याने बेळगावमधून महाराष्ट्रात विविध उद्योग, रोजगार आणि नोकरीच्या निमित्ताने आलेल्या कामगारांनी आपल्या राज्यात परत जाण्यासाठी सुरवात केली आहे. काही कामगार या आधीच राज्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे विविध उद्योगांना कामगारांची टंचाई भासण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. बांधकाम क्षेत्रात मजुरांची टंचाईची समस्या जाणवत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग, बांधकामक्षेत्रात बेळगावमधील कामगार हजारोच्या संख्येने आले आहेत. रस्त्याची दुरुस्ती असो किंवा नवीन रस्ते बांधणी असो ही कामे बेळगावमधील कामगार करतात. घरबांधणीच्या कामातही बेळगावमधील कारागीर आघाडीवर आहेत. बेळगावच्या विविध भागातील मुकादम बेळगावमधील लोकांना रोजंदारीवर काम करण्यासाठी जिल्ह्यात आणतात. सात महिन्याचे पगार आगाऊ देऊन त्यांना आणले जाते. हे कामगार संपूर्ण कुटुंबासह येथे दाखल होतात. पावसाळा संपल्यानंतर ते जिल्ह्यात दाखल होतात. मिळेल ते अंगमेहनीचे काम करतात. पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर ते गावी निघून जातात; मात्र या वेळी ते एप्रिल अखेरपासून गावी जात आहेत. कर्नाटक राज्यात निवडणुकीचा हंगाम सुरू झाल्याने बेळगावमधील मजूर आपल्या गावी परत जात आहेत. बेळगावमधील विविध पक्षाच्या नेत्यांनी जिल्ह्यात येऊन या कामगारांची शोधमोहीम सुरू केली आहे. जे कामगार स्वतः कुटुंब घेऊन आले आहेत त्यांच्या झोपड्यांचा शोध सुरू आहे तर काहींनी आपल्या ओळखीच्या कार्यकर्त्यांना फोन करून परत बोलवण्यास सुरवात केली आहे.
निवडणुकीला अजून एक आठवड्याचा कालावधी असला तरी प्रचारासाठी या मजुरांना माघारी बोलवण्यात आले आहे. जूनमध्ये हे कामगार आपल्या गावी जातात; मात्र एप्रिल अखेरपासून कामगारांनी परतीची वाट धरली आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील उद्योग, बांधकाम आणि घरबांधणीच्या कामावर होत आहे. शासकीय खात्यामार्फत होणाऱ्या कामांसाठी बेळगावमधील कामगारांवर अवलंबून राहावे लागते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शासकीय कामे पूर्ण करावी लागतात तसेच घरबांधणीची कामेही पावसाळ्यापूर्वी संपवण्याकडे बिल्डरांचा कल असतो; मात्र एप्रिलपासून हे कामगार गावी परतू लागले आहेत. मतदान झाल्यानंतर यातील काही कामगार परत येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कर्नाटकमध्ये मतदान होणार आहे. काही कामगार अजूनही जिल्ह्यात आहेत. त्यांनी आपली मजुरी वाढवली आहे. एक स्त्री, एक पुरुष या जोडीला १२०० रुपये मजुरी दिली जाते. आता काही मजूर १४०० रुपये जोडीप्रमाणे मजुरी घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com