नोटिशीला भीक घालत नाही, मी शेतकऱ्यांच्या बाजूने

नोटिशीला भीक घालत नाही, मी शेतकऱ्यांच्या बाजूने

नोटिशीला मी भीक घालत नाही
राजू शेट्टी; बारसू प्रकल्पाबाबत पोस्ट शेअर करायलाही मज्जाव
रत्नागिरी, ता. २ः बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्याने आंदोलनाला चांगलीच धार आली. विरोध मोडित काढण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाने जोरदार बंदोबस्त ठेवला. अनेकांना नोटिसा काढून त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली. शेतकऱ्यांचे आंदोलन ज्या दिवशी चिघळले तेव्हा त्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते होते. या पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनाही प्रशासनाने जिल्हाबंदी केली आहे; मात्र अशा नोटिशीला मी भीक घालत नाही. मी शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली आहे.
आंदोलन चिघळवणाऱ्या किंवा चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी नोटिसा बजावून बंदी घातली होती. जिल्ह्यातील अशा ४५ जणांना जिल्हा, राजापूर आणि बारसू गावात बंदी घालण्यात आली. बारसू येथे माती परीक्षण सुरू झाल्यानंतर त्याला स्थानिकांनी विरोध केला. दोन दिवस शांततेत विरोध झाला. तिसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी ड्रिलिंग सुरू होते त्या ठिकाणी आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिस बंदोबस्त मोडित काढून त्यांनी हा प्रयत्न केल्यावर अडवताना काही प्रमाणात लाठीचार्ज केल्याचा आरोप होत आहे. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे काही कार्यकर्ते असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. खासदार विनायक राऊत यांनीही त्याला दुजोरा दिला होता. त्यामुळे भविष्यात बारसू येथील आंदोलन चिघळू नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस दलाने याबाबत अधिकृत माहिती दिली.
राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्ह्यात यायला बंदी घालण्यात येत असून, बारसू प्रकल्पाबाबत सोशल मीडियात पोस्ट अथवा फोटो शेअर करायलाही मज्जाव करण्यात आला आहे. रत्नागिरीतील पोलिस अधिकाऱ्यांनी शिरोळमधल्या राहत्या घरी मध्यरात्री राजू शेट्टी यांना नोटीस बजावली. अशा नोटिसीला मी भीक घालत नाही. मी शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार. मला आलेली नोटीस बेकायदेशीर आहे. हा तर कहरच झाला आहे. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांनीसुद्धा इतकी बंधने घातली नव्हती. इंग्रजांनी अटक केली; मात्र लोक तुरूंगातून पत्र लिहू शकत होते. अशी कागदी नोटीस मला बंधन घालू शकत नाहीत. कोणाच्या सांगण्यावरून सरकार ही दडपशाही करत आहे, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com