

ratvardha५.txt
फोटो ओळी
१) ratvardha४२.jpg-P२३M००९२१ मंदिर परिसरातील तळेही गूढरम्य वाटते
२) ratvardha४३.jpg -KOP२३M०१२३५ निवसर येथील स्मृतीमंदिर
३) ratvardha४४.jpg -KOP२३M०१२३६ येथील मंदिरातील मूर्ती
४) ratvardha४५.jpg -KOP२३M०१२३७ ‘जाकाय राघो स्मृतिमंदिराचा कळस दुरूनही खुणावतो
इंट्रो
उत्कट प्रेमभावनेचा बाजार मांडू पाहणाऱ्या जगाच्या ‘घशाला कधीमधी जीव कासावीस करणारी कोरड पडावी आणि त्यानं समोर आलेलं पाणी फिल्टरचं आहे? झाकलेलं आहे की नाही? याचाही विचार न करता जणू पाण्याचे घोट घ्यावेत’, असा रोमांचकारी अनुभव देणारी भावरम्य प्रेमकथा अडीचशे वर्षांपूर्वी तळकोकणात घडली होती. संवेदनशील मानवी मनावर मोहिनी घालण्याची क्षमता ठेवून असलेली ही विलक्षण लोककथा आजही स्मृतीमंदिराच्या निमित्ताने जणू दंतकथा बनून राहिली आहे.
- धीरज वाटेकर, चिपळूण - मो. ९८६०३६०९४८
‘जाकाय-राघो’च्या भावरम्य प्रेमकथेचं निवसर
कोकणातल्या राष्ट्रीय महामार्ग ६६वरून प्रवास करताना रत्नागिरीजवळच्या पाली गावातून उजवीकडे जाणारा रस्ता आपल्याला निवसर गावी घेऊन जातो. या गावात मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला वडाच्या झाडांचे सान्निध्य लाभलेल्या तळ्याशेजारी जाकाय आग्रे आणि राघो गोनबरे यांच्या भावरम्य अमर प्रेमकथेचं प्रतीक असलेलं स्मृतीमंदिर उभं आहे. स्मृतिमंदिराची लोककथा समजून घेऊन आपण जेव्हा निवसरला पोहोचतो तेव्हा थोडा वेळ का होईना, आपल्याला जणू आपलाच विसर पडतो. आपलं मन तिथल्या शांत, निवांत परिसरात प्रेमभावना, निर्मळहास्य आणि माणुसकीची हिरवळ शोधत बसतं. हे ठिकाण पर्यटनस्थळाची ‘रमणीयता’ शोधत असून त्याचा पर्यटन अंगाने परिणामकारक विकास होण्याची आवश्यकता आहे.
गावच्या वाडीतील घराजवळच्या खोताचं कूळ असलेल्या सात्विक कुणबी समाजातील सका आग्रे यांची काळी-सावळी, बुजऱ्या चेहऱ्याची, नाकीडोळी नीटस, मध्यम उंची असलेली बसक्या अंगाची मुलगी जाकाय मनस्वी अन् लाघवी स्वभावाची होती. साऱ्या कुळांची शेतकामाची पद्धत एकच असल्याने त्यांची सुखदुःखेही समान होती. वर्षभराची मेहनत, लग्नात काढलेली कर्ज फेडून किती महिन्याचे धान्य हाताशी येत असावं? अशा वातावरणात कोकणातल्या निसर्गातील कंद, जंगलातले फणस, कैऱ्या, हरिकाची पेजपाणी, रानातला टाकळा आदी अनेकदा पोटाची भूक शमवी. त्या वर्षी गावकऱ्यांच्या सल्ल्याप्रमाणे जाकायचं लग्न त्याच वाडीत राहणाऱ्या राघो गोनबरेशी ठरलं होतं. राघो पूर्वीपासून त्याचदृष्टीनं जाकायकडे पाहत असावा. शेतातली कामं उरकताना मागे कधीतरी राघोला जाकायशी बोलायचा अवसर मिळाला होता. जाकायच्या मैत्रिणीही तिला राघोवरून चिडवायच्या. गावातल्या सापडात (लोककला) राघोचा इतरांपेक्षा उंच असलेला पहाडी आवाज ऐकून गाणी-फुगड्यात उत्तम असलेली जाकाय हरवून जायची. गणपतीतल्या जाखडी-गोफवेणीतही राघो १०-१२ गड्यांत उठून दिसत असे. गावकऱ्यांनी जाकाय-राघोचं लग्न ठरवलं आणि ब्राह्मणाला बोलावून मुहूर्त पक्का केला.
राघोने जाकायसाठी सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, पायातल्या साखळ्या, कानातल्या बुगड्या आदी वस्तू तर सकानेही राघोसाठी वस्तू घेतल्या होत्या. लग्नाचं साहित्य आणून झालं होतं. लग्नाचा दिवस जवळ आला. नवरीला हळद लागली. उष्टी हळद राघोला लावण्यात आली. गावात आनंदाचे वातावरण होते.
लग्नाचा दिवस उजाडला. ऐन सकाळी सारी पाहुणेमंडळी गडबडीत असताना राघोला जाकायच्या निसर्गप्रेमाची प्रकर्षाने आठवण झाली. पूर्वानुभवानुसार, सोन्याच्या दागिन्यांपेक्षा पानाफुलांनी सजलेली जाकाय जणू परीसारखी दिसेल या त्याच्या मनातील भावनेने उचल खाल्ली. याच भावनेतून राघो एकाएकी गावच्या जांभूळ भाटल्याच्या रानाकडं निघाला. माहितीतील करंबळाच्या झाडावर चढला. पानाफुलांनी सजलेली जाकाय मनात घर करून असल्याने करंबळाची पानंफुलं गोळा करण्यात किती वेळ गेला, हेही त्याला कळलं नाही. जाकायच्या आठवणीत देहभान हरपलेला राघो, भावी मिलनाच्या कल्पनेने जणू मोहरलेला होता. या फांदीवरून त्या फांदीवर फिरत असताना एका उंचावरच्या फांदीवर त्यानं पाय ठेवला. राघोच्या भारानं फांदी मोडली. अंगाला हळद लागलेला राघो झाडावरून खाली पऱ्हाजवळ कोसळला. त्याचं डोकं खडकावर आपटलं. त्याच्या आवाजानं जवळची लोकं कमालीची अस्वस्थ झाली. हातातली कामं टाकून पऱ्हाकडे पळाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला राघोला पाहून साऱ्यांना धक्का बसला. राघो अखेरच्या घटका मोजू लागला होता.
तिकडे मनानं राघोशी एकरूप झालेल्या, त्याच्या नावची हळद लागलेल्या, साजशृंगार केलेल्या जाकायच्या कानावर हे सारं पडताच ती किंचाळून उठली. तशाच अवस्थेत तिने पऱ्हाजवळ येऊन राघोला पाहिले. राघोच्या हातात जाकायसाठी तोडलेली फुलं होती. जाकाय राघोच्या जवळ बसली. त्याचं नाव आपल्या मुखात घेताच राघोने प्राण सोडला. जाकाय धायमोकलून रडू लागली. बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर जाकायने सती जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या निर्णयाचा सर्वांना धक्का बसला. लग्न न झालेल्या पुरुषाबरोबर सती जाता येत नाही म्हणून तिला समजवण्याचाही प्रयत्न झाला; पण ती कोणाचेच ऐकायला तयार नव्हती. ती अभंग राहिली. अखेर जाकायच्या हट्टानं वडील सका आग्रे चिडले. त्यांनी, ‘एवढी पाणीदार आहेस म्हणून सती जातेस तर लाथ मारून दगडातून पाणी काढून दाखव. तुझं सतीत्व सिद्ध कर.’ म्हटलं. हे ऐकताच जाकाय उठली. वडिलांच्या या अचानकच्या या आव्हानाने आपल्यातील सतीचं सारं तेज एकवटून जणू अंगात संचारल्याप्रमाणे जाकायनेही सत्त्वपरीक्षेचे हे आव्हान स्वीकारले.
‘मी लाथ मारून पाणी काढीन तिथं उपयोगासाठी तळं बांधा आणि प्राण सोडीन तिथं माझ्या प्रेमाचं मंदिर बांधा’, असं साऱ्यांना सांगत जाकायने झाडावरून राघो जिथं पडला होता त्याच पऱ्ह्याच्या बाजूला काळ्या कातळासमोर डोळे मिटून, हात जोडून प्रार्थना केली. रवळनाथाचा धावा केला आणि आपल्यातील सर्व शक्ती एकवटून कातळावर लत्ताप्रहार केला. कातळाचा कपळा उडाला. जाकायच्या पायाच्या अंगठ्याचं नख तुटलं, अद्भुत चमत्कार झाला. कातळातून पाण्याचा ओघ सुरू झाला. सर्वांना आश्चर्य वाटलं. तिकडे जाकायला जणू राघोकडे जाण्याची घाई झालेली असावी. जाकाय क्षणार्धात राघोच्या कलेवरावर कोसळली आणि अंतर्धान पावली. हा प्रकार पाहून सारे चकित झाले. राघो-जाकायच्या प्रेमाची स्मृती कायम जीवंत ठेवण्याकरिता स्मृतीमंदिर बांधण्यात आलं. हे मंदिर बांधलं तेव्हाच जवळच्या कोंडवीतील गावकऱ्यांनी गावात स्थापना करायच्या हेतूने एक विठ्ठलमूर्ती घडवून घेतलेली होती; पण एके रात्री गावप्रमुखाला स्वप्नात दृष्टांत झाला. परमेश्वराने निवसरच्या याच स्मृतिमंदिरात राहण्याची इच्छा व्यक्त केली. ती मूर्ती आज या स्मृतिमंदिरात पाहायला मिळते. स्व. शांताराम द. थत्ते यांनी लिहिलेल्या ‘कोंकणदर्शन’ (१९६४, दुसरी आवृत्ती) पुस्तकात निवसरच्या या जाकाय-राघो लोककथेची नोंद सापडते. विशेष म्हणजे थत्ते यांनी निवसरसंदर्भात लिहिलेल्या लेखाची आमदार शामराव पेजे यांनी दखल घेतली होती. आम्ही २०१३ ला दत्तजयंती दिनी लिहून प्रसिद्ध केलेल्या कोकणातील मठ (ता. लांजा) येथील ‘श्रीक्षेत्र अवधूतवन’ माहिती पुस्तिकेतून आणि २०१४ ला ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने ही प्रेमकथा नव्याने मांडली होती. ही घटना घडली त्या तळ्याजवळ स्थानिकांनी ‘श्रीजाकादेवी मंदिर’ अर्थात ‘जाकाय राघो स्मृतिमंदिर’ उभारल्यामुळे ही लोककथा आज दंतकथा बनून राहिली आहे. आजही निवसरातील हे जाकाईचं मंदिर, शेजारचं तळं, सावळी विठ्ठलमूर्ती आणि तिथल्या रम्य निसर्गाचं गूज आपल्याला जाकाय-राघोच्या आठवणीनं देहभान विसरायला लावतात. कोकणच्या पवित्र भूमीतील आपल्याला अपरिचित असलेल्या भूतकाळाची ही निर्मिती, त्या मागची प्रेमभावना, त्याग, वात्सल्य आणि माणुसकी यांचा आपलासा वाटणारा निवसरच्या निसर्गातील हळवा सूर अनुभवण्यासाठी आयुष्यातील एकतरी ‘इव्हिनिंग इन निवसर’ करायला हरकत नाही.
- (पत्रकार धीरज वाटेकर यांची ‘पर्यटन व चरित्रलेखन’ या विषयावरील आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते गेली २५ वर्षे कोकण इतिहास व संस्कृती यावर लिखाण करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.