ठाकरे सेनेमुळे मराठी माणूस देशोधडीला

ठाकरे सेनेमुळे मराठी माणूस देशोधडीला

07671
कुडाळ ः येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे. व्यासपिठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, रविंद्र चव्हाण, उदय सामंत, रवींद्र फाटक आदी. (छायाचित्र ः धनंजय पानवलकर)

ठाकरे सेनेमुळे मराठी माणूस देशोधडीला

नारायण राणे ः शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रत्येकाला न्याय

कुडाळ, ता. ६ ः तेव्हा शिवसनेत असताना आम्ही मराठी माणसांच्या हितासाठी आणि कोकणच्या विकासाची काम केले. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब गेल्यानंतर ठाकरे सेनेने मराठी माणसाला देशोधडीला लावले; मात्र आता शिवसेना आणि भाजप युतीचे शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. तुमचे अधिकार देण्यासाठी, तुम्हाला योजनांचा लाभ देण्यासाठी ते तुमच्या दारी आले आहेत. हक्काने हाक मारा, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यंत्री फडणवीस तुमच्या हाकेला ओ देवून मदतीला धावतील. प्रत्येकाला न्याय देतील, असा विश्वास केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केला.
ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी हा उपक्रम स्तुत्य आहे. आज जनजीवन, पायभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था, रोजगार, नोकरी अशा कोणत्या अपेक्षा आहेत हे विचारण्यासाठी आणि त्या पूर्ण करण्यासाठी आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस यांच्यामुळे जनतेचे राज्य आले असे वाटू लागले. कारण ते जनतेमध्ये सामील होतात. मागील अडीज वर्षात जे माजी मुख्यमंत्री होते, ते कधी जनतेला भेटत नव्हते. मंत्रालयात कधी आले नाहीत किंवा मातोश्रीवर भेटायला गेले तर भेट देली नाही आणि आमचे मुख्यमंत्री जनतेला भेटून काय हवे आहे? काय योजना द्याव्यात?, दिलेल्या योजना पोचत आहे काय? हे पाहत आहे. किती फरक आहे ते पहा. म्हणून म्हणतो हे जनतेचे सरकार आहे. काल मंत्रलायात माझ्या खात्याची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी १३ कोटी माफ करून जमीन दिली. त्यामुळे उद्योगाचे प्रशिक्षण आता लवकरच सिंधुदुर्गात सुरू केले जाणार आहे. त्यासाठी राज्याला केंद्र सरकार आणि माझे उद्योग मंत्रालय मदत करेल आणि येथील युवकांना येथेच उद्योग शिक्षण मिळेल अशी व्यवस्था केली आहे. समुद्र किनारा फिरण्यासाठी मिनी ट्रेन सुरु करण्याचा माझा प्रयत्न आहे. तसा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांना दिला आहे. पंतप्रधान मोदी त्यासाठी लवकरच मंजुरी देतील असा विश्वास आहे. आधुनिक टेक्नॉलॉजीचे कारखाने आणण्याचा प्रयत्न आहे. मोठे प्रकल्प आले तर त्याचे स्वागत करा. विरोध करणारे कोणाची तरी सुपारी घेऊन विरोध करत आहे. त्यांच्या नादी लागू नका.’’
-----------
07672
कुडाळ ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार वैभव नाईक. बाजूला संजय पडते, रुपेश पावसकर.

शासन आपल्या दारीतून आर्थिक उधळपट्टी

वैभव नाईक; मुख्यमंत्री, राणेंच्या लॉन्चिंगसाठी कार्यक्रम

कुडाळ, ता. ६ ः ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून जनतेला काही मिळाले नाही; परंतु हा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि राणे कुटुंबीयांनी आपले लॉन्चिंग करण्यासाठी केला. यात आर्थिक उधळपट्टी मात्र झाली. शासनाचे दोन ते तीन कोटी रुपये पाण्यात घालण्याच काम शिंदे-फडणवीस सरकारने केलेत, अशी खरमरीत टीका आमदार वैभव नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, बाबी गुरव उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कोणत्याही नवीन अशा घोषणा आज केल्या नाहीत. मंडप उभारणीसाठी, एसटी बस व्यवस्था, पाणी, आसन व्यवस्था सोयीसुविधांसाठी प्रशासन मागील आठ दिवस झटून काम करीत आहे; पण, प्रशाशन शासनाच्या पैशाचा चुराडा करीत आहेत. आज अनेक शासकीय कार्यालयात दिवसभर कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी नव्हता. या कार्यक्रमात केवळ योजनांची पत्र दिली गेली. या योजना खरं तर उद्वव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झाल्या आहेत. त्यांची पत्र आज देण्यात आली. मुख्यमंत्र्यानी वर्षभरात जवळ ६६३ कोटी रुपयांची कामे मंजूर आहेत. परंतु, जवळपास हजार कोटीच्या कामे मुख्यमंत्र्यानी थांबविली आहेत. ती कामे सुरू करण्याची कामे केलेली नाही. कुठल्याही जिल्ह्याच्या विकासाठी नवीन घोषणा नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता त्यांना ओळखते. कारण नवीन अशा घोषणा या कार्यक्रमातून दिल्या नाहीत. या सर्व जुन्या योजना आहेत. मालवण, कणकवलीमधील लाभार्थ्यांना येथे आणून पत्र देण्यात आली. आज कर्जे कोणाला दिली? तर ती भाजप कार्यकर्त्यांना. सर्वसामान्यांना काय दिले? हा कार्यक्रम खर तर लोकांना दारोदारी फिरण्यासाठी केलेला प्रयत्न होता. यांच्या सभांना लोक येत नाहीत. त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना एकत्र आणून दाखवायचे होते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com