चिपळूण : भास्कर जाधव रमेश कदम यांना एकत्र येण्याचा मार्ग मोकळा

चिपळूण : भास्कर जाधव रमेश कदम यांना एकत्र येण्याचा मार्ग मोकळा

Published on

जाधव-कदम यांना एकत्र येण्याचा मार्ग मोकळा

राष्ट्रवादीतील फूट ; चिपळूण मतदारसंघावर वर्चस्वासाठी लक्ष
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः शिवसेना फुटल्यानंतर आमदार भास्कर जाधव पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहिले. राष्ट्रवादी फुटल्यानंतर माजी आमदार रमेश कदम पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहिले आहेत. आगामी काळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी एकत्र राहिल्यास भास्कर जाधव आणि रमेश कदम एकत्र येण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.
राज्यात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी फुटलेल्या शिवसेनेने सहकार्य केले. त्यानंतर फुटलेली राष्ट्रवादी राज्य सरकारमध्ये सामील झाली. आता स्थानिक पातळीवरचे आराखडे बांधले जात आहेत. कोण कुठे एकत्र येईल आणि कोण कोणाला विरोध करेल याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. कोकणातील एकमेकांचे पारंपरिक राजकीय शत्रू असलेले भास्कर जाधव आणि रमेश कदम हे या राजकीय घडामोडीत एकत्र येण्याची शक्यता आहे. आमदार शेखर निकम यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर रमेश कदम ॲक्टिव्ह झाले आहेत. ते मागील पाच वर्ष पालिकेच्या सत्तेपासून लांब आहे. त्यांना पालिका पुन्हा ताब्यात हवी आहे. बदललेल्या राजकीय समीकरणाचा फायदा घेऊन ते पालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतरसुद्धा चिपळूणमधील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते अजूनही ठाकरे यांच्याबरोबर आहे. यातील अनेकांचे पडद्याआड रमेश कदमांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनाही चिपळूण पालिकेत आपले वर्चस्व हवे आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव गुहागरची जागा विक्रांत जाधव यांच्यासाठी ठेवून ते पुन्हा चिपळूणमधून लढू शकतात. भास्कर जाधव यांनी दहा वर्षे, तर रमेश कदम यांनी पाच वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. रमेश कदम आणि भास्कर जाधव या दोघांना मानणारा लोकवर्ग चिपळूण विधानसभा मतदारसंघात आहे. शहरात रमेश कदम यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे कदम यांना शहराचे तर भास्कर जाधव यांना मतदारसंघाचे नेतृत्व हवे आहे. ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना मानसन्मान आणि सत्तेतील वाटा मिळाल्यास तेही भास्कर जाधव आणि रमेश कदमांचे नेतृत्व स्वीकारण्याची शक्यता आहे. अनेक वर्षाचे राजकीय शत्रू असलेले सचिन कदम आणि भास्कर जाधव एकत्र झाले. त्यामुळे भविष्यकाळात भास्कर जाधव आणि रमेश कदम एकत्र आले तर मतदारसंघातील चित्र वेगळे असण्याची शक्यता आहे.


कोट
मला पद आणि आमदारकीचा मोह नाही. राजकारणात राहून जे कार्यकर्ते माझ्याशी जोडले गेले आहेत, त्यांना न्याय देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. भविष्यात कोण एकत्र येतील आणि कोण लांब जाईल, याचीही चिंता नाही. येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी आहे.
- शेखर निकम, आमदार चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.