चिपळूण-एमआयडीसीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाला चालना

चिपळूण-एमआयडीसीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाला चालना

-rat३१p२९.jpg-KOP२३M२०१५८ लोटे एमआयडीसी.
---------

एमआयडीसीमधून प्रक्रिया उद्योगाला चालना

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न ; जिल्ह्यात जागांची पाहणी सुरू

चिपळूण, ता. ३१ ः कोकणात पर्यावरणस्नेही उद्योग आणण्याच्या घोषणा झाल्या; मात्र त्या सत्यात उतरल्या नाहीत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याचा आर्थिक कणा असलेल्या मत्स्य, आंबा आणि काजू उत्पादनावर आधारित कारखाने सुरू करण्यासाठी ठिकठिकाणी स्वतंत्र एमआयडीसी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जागांची पाहणी सुरू आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार आहे.
महाराष्ट्रात ‘एमआयडीसी’ स्थापन होण्याच्या दोन वर्षे अगोदरच रत्नागिरीत सहकारी तत्त्वावर ‘उद्यमनगर’ या औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली; मात्र त्याच काळात येऊ घातलेल्या ‘अॅल्युमिना’ प्रकल्पाला विरोध झाला. तो रद्द होऊन बेळगावला गेला. त्यानंतर प्रकल्प प्रस्तावित व्हावा आणि स्थानिकांनी त्याच्या विरोधात आंदोलन सुरू करावे, हा पायंडाच पडला. लोटे एमआयडीसीतील कागदनिर्मितीचा प्रकल्प, गुहागरमधील रिफायनरी, पेढांबेतील टेल्को कंपनीचा प्रकल्प, अशी अनेक उदाहरणे आहेत.
अलीकडे राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या ‘रिफायनरी’ विरोधाचा विषय ताजा आहे. स्थानिक संसाधनांचा नियोजनपूर्वक वापर करून बरेच लहान उद्योग सुरू करता येतील. त्यासाठी उद्योगमंत्री सामंत यांनी पुढाकार घेतला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात लॉजिस्टिक पार्क, कंटेनर पार्क, मँगो पार्क, मरीन पार्क आणि कॅश्यू पार्क उभारण्यासाठी उद्योगखात्याने तत्वतः मान्यता दिली आहे. त्याला आवश्यक ती जागाही उपलब्ध केली जात आहे. रत्नागिरी तालुक्यात जयगड येथे जिंदल, आंग्रे पोर्टसह तीन मोठी बंदरे एकाच परिसरात आहेत. त्यांचा उपयोग करून आंबा, काजू, मासळी परदेशात पाठवणे शक्य आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊसाची मळीही जयगडमधील या बंदरातून पाठवली जाते. या सर्वांसाठी आवश्यक जागा जयगड परिसरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर वाटद-खंडाळा येथील शेतकऱ्यांशी चर्चा करून कातळावरील पडिक जमिनीचा उपयोग करून प्रदूषणविरहित कारखाना आणण्याचा विचार सुरू आहे. लांजा, राजापूर, दापोली येथे मिनी एमआयडीसी सुरू करण्याचाही विचार उद्योगखात्याकडून सुरू आहे.

कोट
रत्नागिरी जिल्ह्याला ‘फलोद्यान जिल्हा’ घोषित केल्यावर येथील फलोत्पादनात लक्षणीय वाढ झाली; परंतु फळप्रक्रिया उद्योग त्या प्रमाणात वाढला नाही. तो घरगुती स्तरावरच राहिला. कोकमसारख्या बहुमूल्य फळगळतीमुळे आणि कोणी काढत नसल्यामुळे वाया जाते, ही आजही वस्तुस्थिती आहे. काजू बी प्रक्रिया उद्योग चालवणे परवडत नाही, अशी एका बाजूने कुरकूर होत असताना काजू बिया परप्रांतीयांना देऊन त्या बदल्यात वजनएवढे टोस्ट, बटर घेण्यात गावातील गरजू शेतकरी आजही धन्यता मानत आहेत. यात आपले नुकसान होते हे त्याला समजत नाही किंवा समजले तरी त्याची त्या वेळेपुरती नड भागवण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. प्रक्रिया उद्योग आले तर त्याचे स्वागत आहे.
- प्रशांत पटवर्धन, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा उद्योजक फेडरेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com