नळयोजना प्रस्तावाच्या श्रेयाचा प्रयत्न नको

नळयोजना प्रस्तावाच्या श्रेयाचा प्रयत्न नको

20235
संतोष तारी

नळयोजना प्रस्तावाच्या श्रेयाचा प्रयत्न नको

संतोष तारींचा इशारा; सर्वच नगरसेवकांचे योगदान

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३१ ः येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी पुरवठा योजनेचे नूतनीकरण आणि बळकटीकरण यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा आमदार नीतेश राणे यांच्याकडे सादर करण्यात आलेला प्रस्ताव देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्यावतीने तयार केला आहे. शहरातील सर्व नगरसेवकांचे यामध्ये योगदान असून, कोणी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला ठाकरे शिवसेना गटाचे नगरसेवक गटनेते संतोष तारी यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला दिला. नगराध्यक्षांनी प्रशासनाकडून तातडीने प्रस्ताव तयार करून घेतल्याचेही तारी यांनी यावेळी सांगितले.
येथील देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्यावतीने नळ पाणीपुरवठा योजनेचे नूतनीकरण आणि बळकटीकरण यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा तयार केलेला सुमारे ७ कोटी ३१ लाख रुपये खर्चाचा आराखडा भाजप नगरसेवकांनी आमदार राणे यांच्याकडे सुपूर्द केल्याच्या वृत्ताचा आधार घेत तारी यांनी येथील संपर्क कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, निनाद देशपांडे उपस्थित होते.
तारी म्हणाले, ‘‘येथील नगरपंचायतीच्या सभागृहात आमदार राणे यांच्या उपस्थितीत शहरातील पाणी प्रश्‍नाबाबत चर्चा झाली होती. यावेळी शहराच्या पाणीपुरवठा योजना आणि दैनंदिन पाणी व्यवस्थापन याबाबत आढावा घेतला होता. यावेळी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह सत्ताधारी, विरोधी नगरसेवक उपस्थित होते. त्यानुसार दहिबाव येथील पूरक नळ पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात प्रस्ताव देण्याचे आवाहन आमदार राणे यांनी केले होते. त्यामुळे नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी तातडीने प्रशासनाकडून दुरुस्ती कामांच्या आवश्यक बाबींचा समावेश असलेला प्रस्ताव तयार करून घेतला. याचीच प्रत भाजप नगरसेवकांनी आमदारांकडे दिली आहे. पाण्यामध्ये कोणतेही राजकारण असू नये, या भावनेतून पाण्याचा प्रश्‍न गांभीर्याने घेऊन नगराध्यक्षांनी तातडीने प्रस्ताव तयार केला; परंतु भाजप नगरसेवक आपणच प्रस्ताव तयार केल्याचा तोरा मिरवत आहेत, हे चुकीचे आहे. नगराध्यक्षांनी प्रशासनाला सोबत घेऊन त्यांच्याच सहीने प्रस्ताव दिला आहे. यामध्ये स्वीकृत नगरसेवकांसह सर्व १९ नगरसेवकांच्या सहमतीने प्रस्ताव तयार केला असून, त्याचे श्रेय लाटण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे सांगितले. शहराला अनियमित पाणी येत असताना तारी हे पर्यटन करीत असल्याच्या टिकेकडे लक्ष वेधले असता, कोणी कुठे जावे, हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण ज्यावेळी नव्हतो, त्यावेळी पाणी टंचाई नव्हती, तर ती तांत्रिक अडचण होती; मात्र ऐन उन्हाळी हंगामात कोण लंडनला गेले होते, याची माहिती जनतेला असल्याचा टोला त्यांनी यावर लगावला.
....................
चौकट
पाच वर्षांत प्रस्ताव का दिला नाही?
गेली सुमारे नऊ वर्षे नीतेश राणे आमदार आहेत. मागील पाच वर्षे येथील नगरपंचायतीवर त्यांचीच सत्ता होती; परंतु असा प्रस्ताव कधी गेला नव्हता. त्यावेळी त्यांच्या हातून पाण्यासाठी काहीही झालेले नाही. त्यामुळे आताच्या तयार केलेल्या प्रस्तावाचा श्रेयवाद असू नये, असा सूचक सल्लाही संतोष तारी यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com