यंदाच्या अतिवृष्टीत ३१ लाखांची हानी
यंदाच्या अतिवृष्टीत
३१ लाखांची हानी
पंचनामे पूर्ण; जिल्ह्यातील २२०४ शेतकरी बाधित
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १८ ः जिल्ह्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेती, बागायती आणि फळ पिकाचे मिळून ३१ लाख ३४ हजार ५९५ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे २२०४ शेतकरी बाधित झाले आहेत. २५०.०७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.
यावर्षी उशिराने दाखल झालेला मान्सून जून महिन्यात खूपच पिछाडीवर होता. मात्र, जुलैत ही कसर भरून काढली. जुलैची सरासरी भरून काढतानाच एकूण पावसाची सरासरी गाठणारा पाऊस पडला. परिणामी अनेक दिवस शेती पाण्याखाली होती. यामुळे बागायातीला सुद्धा नुकसान पोहोचले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेती, बागायती, फळ पिकांचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने पंचनामे करण्यात आले. हे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार या पावसाने जिरायतीचे २१९.९२ हेक्टर क्षेत्र ३३ टक्के पेक्षा जास्त बाधित झाले आहे. ११.९२ हेक्टर बागायत क्षेत्र बाधित झाले आहे. फळ पिकाचे १८.२३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तिन्ही क्षेत्राचे मिळून २५०.०७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. एकूण २२०४ शेतकऱ्यांना नुकसान पोहोचले असून ३१ लाख ३४ हजार ५९५ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
-------------
चौकट
शेत जमिनीचे ८० हजाराचे नुकसान
मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे सावंतवाडी तालुक्यातील बांदा मंडळ अंतर्गत वाफोली येथील १५ शेतकऱ्यांची ०.८० हेक्टर क्षेत्र जमीन वाहून गेली आहे. देवगड तालुक्यातील पाटगाव मंडळ अंतर्गत विठ्ठलादेवी गावातील एका शेतकऱ्याची ०.०४ हेक्टर जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे त्यांचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. एकूण १६ शेतकऱ्यांची ०.८४ हेक्टर जमीन वाहून गेली आहे. यात वाफोली येथे ७५ हजार रुपयांचे तर विठ्ठलादेवी येथे पाच हजार रुपयांचे असे एकूण ८० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
---------------
कोट
वरिष्ठांच्या आदेशानुसार जुलैत झालेल्या नुकसानीचे पंचनामे संयुक्त पद्धतीने करण्यात आले आहेत. आता हे पंचनामे जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनाला पाठविले जाणार आहेत.
- विजयकुमार राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
---------------
कोट
जुलैत झालेल्या अतिवृष्टीने विशेषतः भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही नुकसानी ३३ टक्के पेक्षा जास्त झालेली आहे. त्यामुळे शासनाने याची नुकसान भरपाई द्यावी. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
- प्रवीण मराळ, शेतकरी
--------------
सोबत तक्ता
जुलैत तालुकानिहाय झालेली हानी
तालुका*एकूण बाधित क्षेत्र(हेक्टर)*शेतकरी संख्या*अपेक्षित रक्कम (रुपये)
दोडामार्ग*१.८७*१८*४६८७५
सावंतवाडी*५४.९०*४९५*९३३००५
वैभववाडी*०.७५*१२*२१५००
मालवण*८८.९६*७०३*८४७०००
कणकवली*२.८६*२६*६४०२५
देवगड*६.०५*१०४*११०८७०
वेंगुर्ले*७.७१* ९१*१६१३२०
कुडाळ*८६.९७*७५५*९५०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

