अभ्यासक्रमात ‘नाट्यशास्त्र’ आवश्यक

अभ्यासक्रमात ‘नाट्यशास्त्र’ आवश्यक

70357
दोडामार्ग ः येथे नाट्य संमेलनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना डॉ. अजय वैद्य. सोबत वामन पंडित, अर्चना घारे, सतीश गवस, प्रकाश गवस व अन्य.


अभ्यासक्रमात ‘नाट्यशास्त्र’ आवश्यक

वामन पंडित ः दोडामार्गात रंगले पहिले नाट्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १० : कला आणि शांती या दोन्ही गोष्टी एकरूप आहेत. सर्वत्र शांती पसरविण्याचे काम कालाकारच निर्माण करू शकतो. कलेतून व्यक्तिमत्त्व घडते तर रंगभूमी कलाकाराला चतुरस्त्र बनवते. गोव्यात ज्या धर्तीवर शालेय जीवनात नाट्यशास्त्र अभ्यासक्रम आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही नाट्यशास्त्र अभ्यासक्रमात आणावा. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे. तरच आजच्या नाट्य संमेलनाचे फलित होईल, असे प्रतिपादन नाट्य संमेलनाध्यक्ष वामन पंडित यांनी केले.
दोडामार्ग तालुक्यातील पहिले नाट्यसंमेलन आज येथील विलास सभागृह येथे झाले. सिंधुदुर्ग साहित्य आणि कला अकादमी, दोडामार्ग यांच्या वतीने हे नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुरेश दळवी, कार्यक्रमाचे उद्‍घाटक अर्चना घारे-परब, प्रमुख पाहुणे अजय वैद्य, सतीश गवस, प्रकाश गवस, बाबूराव धुरी, रमाकांत जाधव, गोविंद शिरोडकर, एस. टी. गवस, दयानंद धाऊसकर, चंद्रकांत मळीक, नगरसेविका संध्या प्रसादी, गणेश ठाकूर, अॅड. सोनू गवस, प्रा. संदीप गवस, उदय पास्ते आदी उपस्थित होते.
पंडित पुढे म्हणाले, ‘‘नाटकाचे बाळकडू लहान वयातच मुलांना मिळाले पाहिजे. त्यासाठी शालेय शिक्षणात नाट्यशास्त्र हा विषय अभ्यासक्रमात आणून त्याचे शिक्षण मुलांना दिले पाहिजे. शालेय शिक्षणात नाट्यशास्त्र विषय आणून त्यातून उदयोन्मुख कलाकार निर्माण करण्यासाठी लोकांनी शासनाचे दरवाजे ठोठावले पाहिजेत. सर्वपक्षीय राजकर्त्यांना एकत्र करून राजकारण विरहित व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे अत्यावश्यक आहे.’’
उद्‍घाटक अर्चना घारे म्हणाल्या, ‘‘प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी नाट्य कलाकारांनी समृद्ध आहे. येथील कलाकार कष्ट, मेहनत व जीव ओतून काम करणारा आहे; परंतु, नाट्य कलेचे शालेय अभ्यासक्रमात शिक्षण दिले जात नाही. या कलेचे शिक्षण अभ्यासक्रमात सामाविष्ट केले पाहिजे. त्यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य मी करण्यास तयार आहे. आजचे हे तालुक्यातील पाहिले नाट्य संमेलन अविस्मरणीय आहे. स्वागताध्यक्ष सुरेश दळवी यांच्यामुळे हे नाट्य संमेलन यशस्वी होऊ शकले.’’
प्रकाश गवस यांनी, कलाकारांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी या नाट्य संमेलनाचा घाट घालण्यात आला. याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश दळवी यांचे सहकार्य लाभले, असे सांगितले. नाट्य संमेलनानिमित्त येथील सिद्धिविनायक मंदिर येथून दिंडी काढण्यात आली. पालखीत नटराज यांची मूर्ती ठेवून पालखी दिंडी सोबत नेण्यात आली. या दिंडीत छोट्या कलाकारांनी कृष्ण, कर्ण, छत्रपती शिवाजी महाराज, हनुमान, अर्जुन यांसारख्या पुराणातील वेशभूषांसह आप्पासाहेब बेलवलकरांची केलेली वेशभूषा लक्षवेधी होती. सदाशिव पाडगावकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश गवस यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संदीप गवस यांनी आभार मानले.
.................
चौकट
जत्रेतील नाटकातून घडले दिग्गज कलाकार
खेडेगावात जत्रेत छोट्या पडद्यावर अनेक नाटके होत होती; मात्र ती नाट्य परंपरा आता धूसर होत चालली आहे. जत्रेतील नाटकांतून अनेक कलाकार घडले आहेत आणि तेच आता दिग्गज कलाकार म्हणून नावारुपाला आहे आहेत. त्यांनी जत्रेतील नाटकातच काम करून आपल्या कलेचा वारसा जोपासला आहे. चोख पाठांतर, शब्दफेक, वेगवेगळ्या जागा यांची सांगड घातली पाहिजे, तरच नाट्यप्रयोग यशस्वी होतो, असे मत डॉ. अजय वैद्य यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com