महायुतीत सुप्त संघर्ष कि रणनिती

महायुतीत सुप्त संघर्ष कि रणनिती

महायुतीत सुप्त संघर्ष कि रणनिती
कार्यकर्त्यांना कोडेः किरण सामंत यांच्या पोस्टनंतरचे पडसाद
एकनाथ पवारः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३ः शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्या सोशल मिडीयावरील पोस्टने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला असला तरी हा भाजप आणि शिवसेनेतील सुप्त संघर्ष कि राजकीय रणनितीचा भाग आहे, याचे कोडे महायुतीच्या कार्यकर्त्यांना सुटत नसल्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीचे तथा ठाकरे गटाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात कोण लढणार, हे स्पष्ट झालेले नाही. महायुतीकडून केंद्रीयमंत्री नारायणे राणे आणि शिवसेनेचे किरण सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याकडून आपलाच उमेदवार असणार असा दावा केला जात आहे. भाजपने या लोकसभा मतदारसंघात आपली मते अधिक असल्याचे वेळोवेळी जाहीर केले तर हा मतदारसंघ पुर्वीपासून शिवसेनेचा आहे. त्यामुळे आपलाच दावा योग्य असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. दोन्ही पक्षांकडून वरिष्ठ जो उमेदवार निवडून आणला जाईल, असे देखील सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे मतदारसंघ मिळविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत प्रचंड सुप्त संघर्ष आहे हे आता स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनी काल (ता.३) सोशल मिडीयावर केलेल्या निवडणुकीतील माघारीच्या पोस्टमुळे हा संघर्ष एकाअर्थी उघड झाला आहे. ही पोस्ट त्यांनी जरी ती पोस्ट डिलीट केली असली तरी त्यांची काहीतरी घुसमट होत असल्याचे उघड झाले आहे. मंत्री उदय सामंत यांनी सारवासारव करीत भावनिक पोस्ट असल्याचे स्पष्ट करतानाच मतदारसंघावर दावा कायम असल्याचे स्पष्टीकरण दिले; परंतु दुसरीकडे केंद्रीयमंत्री नारायण राणेंची त्यांनी भेट घेवून चर्चा केली. कालच्या दिवसभराच्या प्रकारानंतर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्रमुख पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी फोन करून भंडावून सोडले. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आपल्याच पक्षाला मतदारसंघ मिळणार असे सांगुन शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

चौकट
राजकीय रणनितीचा भाग तर नव्हे ?
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नेमका कुणाचा उमेदवार असणार भाजप कि शिवसेनेचा याचा निर्णय येत्या दोन-तीन दिवसांत पक्षश्रेष्ठींना घ्यावा लागणार आहे; परंतु खरोखरच उमेदवार ठरलेला नाही कि हा उमेदवार ऐनवेळी जाहीर करणे हा राजकीय रणनितीचा भाग आहे, याची चर्चा देखील मतदारसंघात सुरू आहे. जोपर्यत उमेदवार कोण आहे हे निश्चित होत नाही, तोपर्यत ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत हे देखील प्रचाराचा मुख्य फोकस कुणावर करावा हे ठरवू शकत नाहीत. त्यामुळे महायुतीच्या गुंतागुंतीमध्ये राजकीय गणित देखील असू शकते, अशी देखील चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com