मतदार संघ पुनर्रचनेमुळे विकास खुंटला

मतदार संघ पुनर्रचनेमुळे विकास खुंटला

१९ (निवडणूक पानासाठी, अॅंकर)

मतदार संघ पुनर्रचनेमुळे विकास खुंटला!

पाच तालुके रायगड मतदार संघात ; १५ वर्षे उत्तर रत्नागिरीचे विकास रखडला

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ४ : रायगड-रत्नागिरी लोकसभा क्षेत्राच्या २००९ ला झालेल्या नव्या मतदार संघ पुनर्रचनेमुळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांची ठोस अशा विकासाची पाटी सलग पंधरा वर्षे कोरीच राहिली आहे. विकासाबाबत या पाच तालुक्यांना वनवास भोगावा लागला आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे खेड, मंडणगड, दापोली, गुहागर आणि काही प्रमाणात चिपळूण या पाच तालुक्यांना म्हणजेच उत्तर रत्नागिरी जिल्ह्यांचा विकास खुंटला आहे.
रायगड-रत्नागिरी लोकसभा क्षेत्राची २००९ ला नव्याने रचना करण्यात आली व पूर्वीच्या रत्नागिरी लोकसभा संघातील दापोली, मंडणगड, खेड, गुहागर व काही प्रमाणात चिपळूण हे पाच तालुके रायगड जिल्ह्यास जोडण्यात आले. या काळात शिवसेनेचे अनंत गीते २००९ व सन २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत विजयी होऊन दोनवेळेस खासदार झाले. रत्नागिरी जिल्ह्याचा लोकसभा मतदार संघ असतानाही उत्तर रत्नागिरीतील तालुक्यांचा म्हणावा असा विकास झाला नव्हता. त्यात विभाजनामुळे आणखीनच भर पडली आहे. याचे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे उत्तर रत्नागिरीतील या पाच तालुक्यांचा केवळ मतांच्या बेरजेसाठी विचार झाला. पराभवातील मतांचे अंतर कमी करण्यासाठी अथवा विजयासाठी आवश्यक असलेली मतांची बेरीज वाढवण्यासाठी येथील मतदानाचा उपयोग होत असतो. त्यामुळे गेल्या दहा वर्षात केंद्र शासनाच्यावतीने हजारो कोटी रुपयांचे रस्ते उभे करत असताना या मतदार संघातून जाणारा व येथील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा मुंबई-गोवा महामार्गाचा प्रकल्प १५ वर्षाहून अधिक काळ रखडला आहे. गुहागर व मंडणगड तालुक्यातील प्रत्येकी एका रस्त्याचा दर्जा राष्ट्रीय महामार्ग असा करण्यात आलेला असला तरी या रस्त्यांची कामे अद्याप पूर्णत्वास गेलेली नाहीत.
२०१९ ला राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी विजयी होऊन मतदार संघाचे बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य या समस्या गंभीर नेतृत्व केले. या निवडणुकीत आता निवडणुकांच्या आधी केंद्र शासनाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णयांवर काम करण्याची जाहीर घोषणा करणाऱ्या उमेदवारांकडून अपेक्षित सर्वसमावेशक विकासाची ठोस कार्यवाही का झाली नाही, याबाबत जनतेमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बदलत्या काळातील आरोग्य, शिक्षण, रोजगार व माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांच्या विकासाकडे कोणीही विशेष लक्ष दिलेले नाही. उत्तर रत्नागिरीतील या तालुक्यांमध्ये बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य या समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे. या तिन्ही बाबींसाठी येथील जनता आजही मुंबई व पुणे या दोन महानगरांवर अवलंबून आहे. खेड तालुक्यातील लोटे येथील औद्योगिक वसाहत वगळता उत्तर रत्नागिरीतील अन्य तालुक्यांमध्ये मिनी एमआयडीसीही कार्यरत नाही. दुसऱ्या बाजूला या भागात पर्यटन, शेती व सेवा या संभाव्य उद्योगांच्या प्रगतीकरिता लोकप्रतिनिधी या नात्याने सगळ्यांनीच किती प्रयत्न केले याबद्दल संशोधन करावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com