कुडाळमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत

कुडाळमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत

82744
कुडाळ ः मोकाट कुत्र्यांच्या त्रासाबाबत शहरातील नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाशी चर्चा केली.

43770
संग्रहित

कुडाळमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत

शहरातील नागरिक त्रस्त ः उपाययोजनेबाबत प्रशासनाशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असून, मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत सुधार समिती व नागरिकांनी नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे व मुख्याधिकारी अरविंद नातू यांची भेट घेऊन चर्चा केली. माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट संजय भोगटे, कुडाळ तालुका सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट, सुहास बानवलेकर, सिद्धेश सावंत, राकेश म्हाडदळकर, उमेश परब, नागेश सावंत, स्वयंम वर्दम, ओमकार गोसावी आदी नागरिक उपस्थित होते.
भटक्या कुत्र्यांसंदर्भात मागील काही महिन्यांत प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली; परंतु काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. आज भटक्या कुत्र्यांचा वावर शहरातील चौकाचौकात दिसत आहे. या कुत्र्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज लोकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तुम्ही प्रशासनाकडून काणत्या उपाय योजना करणार आहात, असा सवाल संजय भोगटे यांनी केला. महिन्याच्या आत तोडगा काढा. कुत्रे पकडणाऱ्या संस्थांशी संपर्क साधा, असे भोगटे यांनी सांगितले. यावर मुख्याधिकारी नातू यांनी, यासंदर्भात अजून टेंडर निघालेली नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत निवेदन देऊन लवकरात लवकर टेंडर काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी शहरातील अनेक विकास कामांबाबत उपस्थित नागरिकांनी प्रशासनासोबत चर्चा केली.
कुडाळ शहरात नगरपंचायत अस्तित्वात येऊन नऊ वर्षे झाली; परंतु भाजी मार्केट व मच्छिमार्केटचा प्रश्न अजूनही ''जैसे थे''च आहे. हा प्रश्न पूर्ण होईपर्यंत नगरपंचायत प्रशासनाने घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर ग्रामपंचायत दर्जाप्रमाणे घ्यावेत, अशी मागणी व्यापारी संघटना माजी अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी केली. तसा ठराव मासिक सभेत घेण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. कुडाळ बाजारपेठ चांगली होणे गरजेचे आहे. शहरात भाजी मार्केट सुरू करा. आज रस्त्यावर बाहेरचे भाजीवाले बसत आहेत. त्यामुळे वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. एखाद्या वेळेस अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रसाद शिरसाट यांनी करून त्यासंदर्भात तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. शहरात आज वन-वे होण्याची गरज आहे; परंतु तो झाला नाही. दुचाकी वगळून वन-वेला मान्यता द्या, अशी मागणी संजय भोगटे व प्रसाद शिसाट यांनी केली. यावर किरण शिंदे यांनी, ‘वन-वे’ला बाजारातील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे तो होऊ शकला नाही. त्यासाठी व्यापाऱ्यांनी एकजुटीने निर्णय घेणे गरजेचे आहे, असे सांगितले.
---
अपघाताच्या घटना, नागरिकांवर हल्ले
दोन दिवसांपूर्वी कुडाळ-मालवण रस्त्यावर औदुंबरनगर येथे भटक्या कुत्र्यांमुळे दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला होता. यापूर्वीही कुत्र्यांमुळे अनेक अपघात झाले होते. पिसाळलेल्या कुत्र्यांनीही हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासानाने लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com