दर्जेदार पदार्थ विक्रीसाठी ११० व्यवसायिकांना प्रशिक्षण

दर्जेदार पदार्थ विक्रीसाठी ११० व्यवसायिकांना प्रशिक्षण

दर्जेदार पदार्थांसाठी व्यावसायिकांना प्रशिक्षण
दीनानाथ शिंदेः अन्नसुरक्षा प्रशासन विभागाकडून कारवाईपेक्षा प्रबोधनावर भर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः ‘‘उन्हाळी सुटीमध्ये कोकणात पर्यटक ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल होतात. पर्यटकांना उत्तम खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी आता अन्नसुरक्षा प्रशासनाने खाद्यपदार्थ बनवून विकणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांचे प्रबोधन करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी यंदा ११० व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले आहे,’’ अशी माहिती अन्नसुरक्षा प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांनी दिली. गत वर्षी जिल्ह्यातील ४५० व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले होते, असेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात ५ हजार परवानाधारक हॉटेल्स आणि १४०० रेस्टॉरंट आहेत. नोंदणीकृत दुकानांची संख्या ३५०० ते ४००० आहे. अन्नसुरक्षा विभागात जिल्ह्याला तीनच निरीक्षक नियुक्त असल्यामुळे नोंदणीकृत उपाहारगृहातील खाद्यपदार्थ तपासणी करणे अशक्य आहे. एका निरीक्षकाकडे तीन तालुक्यांचा भार दिला गेला आहे. सध्या या विभागाकडून नियमित तपासणी सुरू आहे. त्यात अधिक जोखीम असलेल्या मिठाई, मच्छी आदी नाशवंत खाद्यविक्रेत्यांकडे अचानक तपासणी करून पाहणी करण्यात येते. अन्नपदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. कमी कर्मचाऱ्यांमुळे अडचणी असल्या तरीही नियमित कामकाज सुरू आहे. ग्राहकाला स्वच्छ, ताजे आणि उत्तम अन्न मिळावे, यासाठी व्यावसायिकाला विशेष प्रशिक्षण देण्याचा उपक्रम अन्नसुरक्षा प्रशासनाने हाती घेतला आहे. यामध्ये आवश्यक ते कायदे आणि सूचना दिल्या जातात. गत वर्षीपासून याला आरंभ झाला आहे.

---------
चौकट 1
एका अधिकाऱ्यांकडे तीन तालुके
तालुक्यातून मिळालेले नमुने संकलित करून ते मुंबईला तपासणीसाठी पाठविण्यात येतात. ते गोळा करण्यासाठी जिल्ह्यातून महिन्याला २० नमुन्यांचे लक्ष्य दिले आहे. अन्नसुरक्षा कार्यालयातर्फे प्रत्येक अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची नऊ तालुक्यांत विभागणी केली आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, मंडणगड, खेड, दापोली या तालुक्यांसाठी या कार्यालयातून तीन अधिकारी कार्यरत आहेत. प्रत्येक अधिकाऱ्यांना तीन तालुक्यांचा कारभार सांभाळावा लागतो.

-----------
चौकट
महिन्याला उद्दिष्ट
महिन्यात कोणते नमुने घ्यायचे, याबद्दल अधिकाऱ्यांना मुंबई कार्यालयातून सूचना दिलेल्या आहेत. त्या प्रमाणे येथील अधिकारी संकलन करतात आणि ते मुंबईत कुर्ला-बांद्रा येथील शासनाच्या प्रयोगशाळेत पाठवतात. जानेवारीत चहा व फास्टफूड, मार्च- बेकरी उत्पादने, एप्रिल- शीतपेय आणि तयार खाद्यपदार्थ (इन्स्टंट फूड). मेमध्ये फळं आणि भाज्या, लोणचे आदींचा समावेश आहे. पंचनामा व नमुने संकलित करून ते पोस्टाद्वारे तपासणीसाठी पाठवतात. त्याचा अहवाल आल्यानंतर दोषी असल्यास कारवाई केली जाते.

-------
चौकट
व्यावसायिकांच्या समस्या
अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना ऑनलाइन झाल्यामुळे व्यावसायिकांना अडचण येते. काही खासगी महा ई- सेवा केंद्रातून ऑनलाइन नोंदणी करतात. अन्य कागदपत्रांसाठी परवाना भरता येत नाही. अशा अनेक ग्राहकांनी अन्नसुरक्षा कार्यालयात येऊन मागणी केली. या परवान्यासाठी कार्यालयातच सेतू कार्यालयाची सुरवात करण्यात आली आहे. ११० रुपयांत त्यांना परवाना मिळतो. मात्र नोंदणी आणि परवाना (लायसन) मंजुरी सहायक आयुक्त अन्नसुरक्षा विभागाकडून दिली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com