चिपळूण-पिंपळीत रस्त्यालगत लावलेली रोपे सुकली

चिपळूण-पिंपळीत रस्त्यालगत लावलेली रोपे सुकली

rat13p7.jpg
83279
पिंपळीः चिपळूण-कराड मार्गावरील पिंपळी येथे रस्त्याच्या कडेला लावलेली रोपे कडक उन्हामुळे सुकली आहेत.
---------
पिंपळीत रस्त्यालगत लावलेली रोपे सुकली
ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष; महामार्ग विभागाची नोटीस, पावसाळ्यापूर्वी पुन्हा तयारी करण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण ते पिंपळी या दरम्यान रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. दुरुस्तीदरम्यान ठेकेदाराने तोडलेली झाडे पुन्हा लावली नाही. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी जागरूक झाले आहेत. त्यांनी संबंधित कंपनीला पावसाळ्यापूर्वी झाडे लावण्याचे नियोजन करण्याची सूचना केली आहे.
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण ते पिंपळीदरम्यानच्या रस्त्याचे पुनर्वसन आणि दुरुस्ती करण्याचे काम मनीषा राज जेव्ही कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. कंपनीने अनिवार्य वनीकरणअंतर्गत वृक्षारोपणाचे काम कार्यान्वित केले आहे; मात्र कंपनीने लागवड केलेल्या झाडांची योग्यप्रकारे देखभाल केली गेली नाही, योग्य ट्रीगार्ड दिलेले नाहीत आणि झाडांची संख्या कोरडी अवस्थेत पाळली गेली आहे, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे. अनेक ठिकाणी लावलेली झाडे कडक उन्हामुळे सुकून गेली आहेत. काही झाडे गुरांनी खाल्ली. महामार्गाच्या दोन्ही बाजूने झाडे दिसत नाहीत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव, शहानवाज शहा, प्रकाश काणे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. ठेकेदार कंपनीने लावलेली झाडे स्थानिक प्रजातीची नाहीत. झाडांना दैनंदिन पाणी दिले गेले नाही. त्यामुळे अनेक झाडे मेली आहेत. त्यांचे अवशेषही रस्त्याच्या कडेला दिसत नाही. त्यामुळे ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्यात यावी किंवा कंपनीकडून पुन्हा झाडे लावून घेण्यात द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पथकाने दुरुस्ती केलेल्या महामार्गाची पाहणी केली. या दरम्यान कंपनीने वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी झाडांचे अवशेषही सापडले नाही. त्याची गंभीर दखल घेऊन कंपनीला राष्ट्रीय महामार्ग विभागाने नोटीस पाठवली आहे. वृक्ष लागवड आणि त्यानंतरची देखभाल दुरुस्ती याकडे कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे कंपनीवर ताशेरे ओढण्यात आले आहे.
पावसाळा तोंडावर आहे त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी कंपनीने वृक्षारोपणासाठी जागोजागी खड्डे काढावेत, त्यात खताची व्यवस्था करावी. झाडांना बारमाही पुरेसे पाणी मिळेल याची व्यवस्था करावी. रोपे निवडताना ती स्थानिक जातीची निवडावीत. ठराविक अंतराने झाडे लावावीत, योग्य ट्रीगार्ड लावावी, झाडांना पाणी देण्याची क्रिया नियमित अंतराने करावी तसेच वृक्षारोपणासाठी खड्डा खोदणे आणि खत टाकणे हे पावसाळ्यापूर्वी म्हणजे उन्हाळ्यात चांगले करणे अपेक्षित आहे. वृक्षारोपणपूर्व उपक्रम तातडीने सुरू करावेत. जर कंत्राटदार आयआरसी वैशिष्ट्यांनुसार वृक्षारोपणाच्या कामाची तसेच देखभाल करण्यात अपयशी ठरला तर तेच काम कंत्राटदाराच्या जोखीम आणि खर्चाच्या अंतर्गत प्राधिकरणाद्वारे अंमलात आणले जाईल, असा इशारा कंपनीला दिला आहे.

कोट
झाड कंपनीने तोडावे किंवा सामान्य माणसाने. तोडलेल्या झाडाच्या बदल्यात नवीन झाड लावणे गरजेचे आहे. झाडे लावणे आणि त्याची योग्य निगा राखण्यासाठी ठेकेदार कंपनीला पैसे मिळत असताना या कामाकडे ठेकेदार कंपनी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष देऊन हे काम ठेकेदार कंपनीकडून घेण्यात यावे अन्यथा स्थानिक नागरिक कायदेशीर मार्गाने कंपनी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जातील.
- शाहनवाज शाह, जलदूत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com