सावंतवाडीवासीय वाहतूक कोंडीने हैराण

सावंतवाडीवासीय वाहतूक कोंडीने हैराण

swt1413.jpg
M83594
सावंतवाडीः शहरात आठवडा बाजारादिवशी झालेली वाहतूक कोंडी.

सावंतवाडीवासीय वाहतूक कोंडीने हैराण
नागरिक, चालक त्रस्तः प्रशासनाकडे तोडगा काढण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ः शहरात आज वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागला. आठवडा बाजार आणि पर्यटकांची वाढलेली गर्दी यामुळे दिवसभर शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी जाणवली. वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी कोंडी सोडविण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यांना यश आले नाही. याप्रश्नी पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे.
सावंतवाडी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीत शहरात मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आंबे विक्री सुरू आहे. त्यातच संत गाडगेबाबा मंडईचे सुरू असलेले काम आणि तेथील दुकान व्यावसायिकांना बाजारातच अन्य ठिकाणी दिलेली जागा या सर्वांचा विचार करता बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडीचा सामना दररोज करावा लागतो. सध्या मुंबई-पुणे येथे चाकरमानी तसेच पर्यटकही मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. खरेदीच्या निमित्ताने ते बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे आपसूकच वाहन कोंडी होते. आज सकाळपासूनच दिवसभर येथील मुख्य बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडी जाणवत होती. आंबा खरेदीसाठी होणारी गर्दी आणि बाजारासाठी आलेले ग्रामीण भागातील नागरिक या सर्वांमुळे हे कोंडी वारंवार पाहायला मिळत होती. शहरात नगरपालिकेच्या समोर एका ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात केलेला असतो. त्यापलीकडे कुठेही वाहतूक पोलिस तैनात नाही. त्यामुळे जुन्या बसस्थानकाच्या मार्गावर हॉटेल चंदू भवनपासून गांधी चौकापर्यंत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने प्रामुख्याने याला कारणीभूत ठरत आहेत.
शहरातील मुख्य बाजारपेठेचा विचार करता संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या कामामुळे ठिकठिकाणी दुकानदारांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. एकूणच यामुळे वाहतुकीदरम्यान एखादे मोठे वाहन आल्यास वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे शहरात वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी अजून वाहतूक पोलिसांची गरज जाणवते. आणखी पंधरा ते वीस दिवस पर्यटकांची वर्दळ असणार, असे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जाणवणार आहे. या कालावधीत गांधी चौक परिसरात वाहतूक पोलिस तैनात केल्यास ही कोंडी नियंत्रणात आणण्यास मदत होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाने व पोलिस प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे.

कोट
सावंतवाडी शहरामध्ये भाजी मंडईच्या नव्या इमारतीचे काम सुरू असल्याने मुख्य बाजारपेठेमध्ये वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. यासंदर्भात पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते; परंतु कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने काहीच पावले उचलली नाहीत. आंबा हंगाम आणि पर्यटकांची वर्दळ यामुळे पुढील पंधरा दिवस ही कोंडी सतत जाणवणार आहे. या कालावधीमध्ये पालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून यावर मार्ग काढावा.
- आनंद नेवगी, माजी नगरसेवक, सावंतवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com