राष्ट्र सेवादलाची शिबिरे फलदायी

राष्ट्र सेवादलाची शिबिरे फलदायी

83680
वागदे ः येथील पत्रकार परिषदेत बोलताना बाबासाहेब नदाफ.


राष्ट्र सेवादलाची शिबिरे फलदायी

बाबासाहेब नदाफ ः वागदे येथील गोपुरी आश्रामात मार्गदर्शन

कणकवली,ता. १४ ः लोकशाही, राष्ट्रहित, वैज्ञानिकता, धर्मनिरपेक्षता यासह देश व समाजहिताच्या कार्यात राष्ट्र सेवा दलाचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. राष्ट्र सेवादलातर्फे विद्यार्थ्यांसाठी वर्षाला देशभरात विविध ठिकाणी १०० हून अधिक व्यक्तिमत्व शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणला जातो, अशी माहिती राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ यांनी दिली.
अद्वैत फाऊंडेशन व राष्ट्रीय सेवा दलाच्या संयुक्त विद्यमाने वागदे येथील गोपुरी आश्रामात विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्व विकास शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अद्वैत फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता पवार, सचिव राजन चव्हाण आदी उपस्थित होते.
बाबासाहेब नदाफ म्हणाले, ‘‘शिबिरांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर लोकशाही, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिकवाद, राष्ट्रवाद यासह समाजहिताचे संस्कार रुजवले जात आहेत. देशातील युवा पिढीच्या हाती रोजगार नाही. परिणामी तरुण व तरुणी आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. आर्थिक संकटाच्या चक्रव्यूहात युवा पिढी अडकल्यामुळे देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीयसह अन्य प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी ही पिढी पुढे सरसावताना दिसत नाही.’’
श्री. नदाफ म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व हिंदूस्थान सेवा दल कार्यरत होता. स्वातंत्र्यानंतर या दलात दोन गट पडले. यातून काँग्रेस सेवा दल व राष्ट्रीय सेवा दल या दोन दलाची निर्मिती झाली. राष्ट्रसेवा दल हे राष्ट्रसेवा व समाजहिताला प्राधान्य देणारी संघटना आहे. या संघटनेवर समाजवादीचा पगडा आहे. अलीकडच्या काळात समाजात विषमता वाढत असून ही विषमता समाज व देशासाठी घातक आहे. ही विषमता दूर करण्याचे कार्य राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षे सुरू आहे. लोकशाही, राष्ट्रहित, वैज्ञानिकता, धर्मनिरपेक्षता यासह देश व समाजहिताच्या कार्यात राष्ट्रसेवा दलाचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. मुलांसाठी वर्षभरात राष्ट्र सेवा दल देशभरात १०० हून अधिक शिबिरे घेत असते.’’ दरम्यान, मालवण व वेंगुर्ले येथे शिबिरे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यकर्त्यांना सत्तेची धुंद चढली आहे. त्यामुळे देश व समाजाचे मोठे नुकसान होत आहे. सत्तेच्या धुंदीपायी राज्यकर्त्यांना देश व समाजहिताचे भान राहिलेले नाही. सत्तेच्या धुंदीमुळे पक्ष व संघटनांच्या माध्यमातून कार्यकर्ते घडविण्याची प्रक्रियेला अलीकडच्या काळात ब्रेक लागला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com