लागवडीखालील क्षेत्र 4,054 हेक्टरने घटले

लागवडीखालील क्षेत्र 4,054 हेक्टरने घटले

१६ (टूडे ३ साठी, अँकर)

लागवडीखालील क्षेत्र ४ हजार ५४ हेक्टरने घटले

जिल्ह्यातील स्थिती ; भात शेतीत तीन तर नाचणी दोन टक्क्यांनी घट

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः वातावरणातील बदलांसह अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून आंबा, काजू आदी फळांसह भात, नाचणी शेतीचे नुकसान होत आहे. तरीही जिल्ह्यात आंबा, काजू फळांसह भाजीपाला पिकाखाली येणारे जमीन क्षेत्र कमी झालेले नाही. गेल्या दहा वर्षात फळे, भाजीपाल्याचे क्षेत्र ७ टक्क्यांनी वाढले आहे. त्याचवेळी भात शेती ३ टक्क्याने तर नाचणी पिकाखालील क्षेत्र २ टक्क्यांनी कमी झाले आहे. शेती क्षेत्र कमी झाल्याने लागवडीखालील क्षेत्रही ४ हजार ५४ हेक्टरने घटले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी ७२ टक्के जमीन जंगलव्याप्त, २७ टक्के शेतीला उपलब्ध नसलेले, ४० टक्के लागवड न केलेले किंवा पडिक क्षेत्र आहे. सुमारे ३२ टक्के जमीन कसलेली आहे. जिल्ह्यात २०२२-२३ च्या कृषी विभागाकडील नोंदीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्र २ लाख ६७ हजार ७५० हेक्टर इतके आहे. हेच लागवडीखालचे क्षेत्र २०१२-१३ साली म्हणजे दहा वर्षांपूर्वी २ लाख ७१ हजार ८०४ हेक्टर इतके होते. दहा वर्षांपूर्वी भात शेतीखाली २६ टक्के तर नाचणी पिकाखाली ६ टक्के क्षेत्र होते. फळे आणि भाजीपाल्याच्या पिकाखाली ६४ टक्के क्षेत्र होते. दहा वर्षानंतर तांदूळ पिकाखालचे क्षेत्र ३ टक्क्यांनी कमी होऊन २३ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. नाचणी पिकाखालचे क्षेत्र २ टक्क्यांनी घसरून ४ टक्क्यावर आले आहे. फळे व भाजीपाल्याच्या पिकाखालचे दहा वर्षांपूर्वीचे क्षेत्र ६४ टक्के होते ते ७ टक्क्यांनी वाढून ७१ टक्के इतके झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जमिनीचे चार प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये ओलावा धरून ठेवणारी जमीन असते तेथे भात शेती होते. किनाऱ्‍यालगतच्या जमिनीजवळ सुपारी आणि नारळाच्या बागा असतात. डोंगर उताराच्या वरकस जमिनीत आंबा, काजू फळांसह नाचणी, वरीचे पिक घेतले जाते. खाडी आणि समुद्राच्या पाण्याने खराब झालेली जमीन कृषी उत्पादनास योग्य मानली जात नाही. आंबा आणि काजू बागायतदार गेल्या अनेक वर्षांपासून नुकसानीत आहेत. शेतीचीही तीच अवस्था आहे. परंतु आंबा, काजू फळ बागायतीवर कोणताही परिणाम न होता ही बागायती गेल्या दहा वर्षात वाढतच गेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com