कोकणात आणखी दोन मार्गाचा विचार

कोकणात आणखी दोन मार्गाचा विचार

८ (पान १ साठी)

कोकणात आणखी दोन मार्गाचा विचार

प्रस्तावितचा अभ्यास सुरू ; मुंबई-गोव्यासाठी तीन पर्याय उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नकार दिल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने मुंबई-गोवा यादरम्यान आणखी दोन महामार्ग बांधण्याचा विचार करत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी या प्रस्तावित मार्गाचा अभ्यास करीत आहेत.
मुंबई ते गोवापर्यंतचा विद्यमान रस्ता प्रवासासाठी आजच्या घडीला अत्यंत त्रासदायक, अडचणीचा ठरत आहे. गोवा ते मुंबई महामार्गाची बांधणी, रुंदीकरण मागील कित्येक वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे. पण हे काम काही पूर्ण होत नसल्याने प्रवास केव्हा सुकर होणार, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
मुंबई ते गोवा प्रवास वेगवान आणि सुकर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुढाकार घेतला आहे. त्यानुसार गोवा-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि गोवा ते मुंबई सागरी किनारा मार्ग असे दोन रस्ते प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यास गोव्यातून मुंबईला जाण्यासाठी रस्त्यांचे तीन पर्याय उपलब्ध होणार आहेत. पत्रादेवी येथे हे महामार्ग गोव्याच्या महामार्गाला जोडले जातील, असे महाराष्ट्र सरकारने गोवा राज्य सरकारला कळविले आहे. यासाठी अद्याप भूसंपादन झालेले नाही. मात्र, आराखडा तयार केल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे. पत्रादेवी येथे चार महामार्ग जोडले जाणार असल्याने गोवा सरकारला आपल्या हद्दीत त्याची तरतूद करावी लागणार आहे.
एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई ते गोवा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हा महामार्ग ३८८ किमी लांबीचा आणि सहापदरी असेल. नवी मुंबईतील पनवेल येथून हा महामार्ग सुरू होणार असून गोवा-महाराष्ट्र सीमेवर पत्रादेवी येऊन संपेल. या महामार्गामुळे आठ तासांचे अंतर केवळ तीन तासांवर येणार आहे. त्यासाठी ४२०५.२१ हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. या प्रकल्पासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
----------
चौकट
सागरी मार्गासाठी निविदा
या महामार्गाबरोबरच ''एमएसआरडीसी''कडून गोवा ते मुंबई सागरी मार्गही बांधला जाणार आहे. रेवस ते रेडी असा ४९८ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा मार्ग असेल. त्यासाठी अंदाजे दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सागरी किनाऱ्यालगत मुळातच काही पूल आहेत. मात्र ते एकमेकांना जोडलेले नाहीत. त्यामुळे सलग सागरी किनारा रस्ता तयार करण्यासाठी ''एमएसआरडीसी''ने रेवस ते रेडी सागरी किनारा मार्ग हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पुलांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com