साडेसहा तासात मतमोजणी होणार पूर्ण

साडेसहा तासात मतमोजणी होणार पूर्ण

साडेसहा तासात मतमोजणी होणार पूर्ण
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ; चिपळूणपासून सुरवात
रत्नागिरी, ता. २ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. १ हजार १५८ इतक्या कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती केली असून, सकाळी ७ वा. स्ट्राँगरूमचा दरवाजा उघडला जाणार आहे. ८ वाजल्यापासून पोस्टलची मतमोजणी सुरू होईल. पहिला राउंड साडेदहा वाजेपर्यंत संपेल तर मतदान प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपारी अडीच वाजतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. सिंह म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी भारतीय अन्न महामंडळाच्या एमआयडीसी येथील गोदामात होणार आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर मतमोजणी पर्यवेक्षक व सहाय्यक यांची सरमिसळ करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ६ वा. टपाली मतपत्रिकांची वाहतूक जिल्हा कोषागार कार्यालयातून मतमोजणी ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे.
ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा संघनिहाय एकूण १४ टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. चिपळूण विधानसभेमध्ये एकूण ३३६ मतदान केंद्रांमध्ये २४ फेऱ्या, रत्नागिरी विधानसभेमध्ये एकूण ३४७ मतदान केंद्रांमध्ये २५ फेऱ्या, राजापूरमध्ये ३४१ मतदान केंद्रांमध्ये २५ फेऱ्या, कुडाळमध्ये २७८ मतदान केंद्रांवर २० फेऱ्या, कणकवली ३३२ केंद्र २५ फेऱ्या होणार आहेत तर सावंतवाडी ३०८ निवडणूक केंद्रांमध्ये २२ फेऱ्या होणार आहेत. मतमोजणासाठी १ हजार १५८ इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक उमेदवाराच्या ९९ प्रतिनिधी उपस्थित असतील.
एक फेरी साधारण ६० हजारांवर मतांची मोजणी होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात एकूण ६३.०४ टक्के मतदान झाले होते. एकूण ९ लाख ७६ हजार ६१८ जणांनी मतदानाचा अधिकार नोंदवला होता. त्यामुळे मतदारांचा कौल कोणाला मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून भुवनेश प्रतापसिंह तसेच आर. रेवती यांची नियुक्ती केली आहे. महायुती, महाविकास आघाडी आदी पक्षांसाठी मतमोजणी केंद्रापासून काही अंतरावर स्वतंत्र व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये सामिल असलेल्या सुमारे ६ हजार कर्मचाऱ्यांपैकी साडेतीन हजार कर्मचाऱ्यांनी मतदान केले नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने नाराजी व्यक्त केली.

चौकट
विजयी मिरवणूक, वाद्यांना परवानगी नाही
मतमोजणीदिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील प्रवेशमार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाणार आहे. लॉज, हॉटेल यांची तपासणी करण्यात येणार आहे. मतमोजणीदिवशी विजयी उमेदवाराला मिरवणुकीला आणि वाद्यांना परवानगी राहणार नाही. ५ तारखेनंतर पोलिसबळाची उपलब्धता यांची शहानिशा करूनच त्यानंतर विजयी मिरवणुकीला परवानगी देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com