पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याची आशा धूसर

पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याची आशा धूसर

पहिल्या दिवशी गणवेशाची आशा धूसर

जिल्हा परीषद ; १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांना लाभ

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी लागणाऱ्‍या कापडाचा पत्ता नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळण्यासाठी आशा धूसरच आहे. जिल्ह्यातील १ लाख विद्यार्थ्यांना हा गणवेश मिळणार आहे.
शासनाने ‘एक राज्य एक गणवेश’ या धोरणाचा अवलंब करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार समग्र शिक्षा अंतर्गत या शैक्षणिक वर्षात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये १ ली ते ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोफत गणवेश उपलब्ध करून दिला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांना सुमारे २ लाख ८ हजार गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र शैक्षणिक सत्र सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. परंतु ९ तालुक्यातील एकाही विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी कापडच आले नाही. त्यामुळे कापड येणार कधी, शिलाई होणार कधी आणि गणवेश मिळणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने सर्व जिल्ह्यांना कापडाचा पुरवठा करण्यासाठी निविदा काढून एका ठेकेदारावर जबाबदारी दिली आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार जिल्हास्तरावर कापड पुरवठा केला जाणार आहे. बटन, दोरा, हूक, इलॅस्टिक अशा गणवेश शिलाईसाठी लागणाऱ्‍या वस्तू दिल्या जाणार आहेत. जिल्हास्तरावर गणवेशाची शिलाईची जबाबदारी स्थानिक महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. जिल्ह्याला गणवेशासाठी लागणाऱ्‍या कापडाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना काही दिवस गणवेशाची वाट पाहावी लागणार, हे स्पष्टच आहे. विद्यार्थ्यांना गणवेशासाठी समितीसुद्धा गठीत करण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, अध्यक्ष असणार आहेत. तर महिला आर्थिक महामंडळाचे जिल्हा प्रतिनिधी, पाच शाळांचे मुख्याध्यापक, लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक सदस्य असणार आहेत.

------
गणवेशासाठी कापडाची प्रतिक्षा

गणवेशासाठी कापड मिळाल्यानंतर महिला बचतगटांना हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महिला बचतगटांची गावागावात निवडही करण्यात आली आहे. मात्र कापडच नसल्याने त्यांना काही करता येत नाही. वास्तविक कापड हे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात मिळणे अपेक्षित होते. मात्र आता मे महिना जवळपास संपलाच आहे. तरीही कापडाचा पत्ता नसल्याने विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेशाविनाच शाळेत जावे लागणार असल्याचे दिसत आहे. दरवर्षीच असा प्रकार घडत असल्याने शासनाची पहिल्या दिवशी गणवेश ही घोषणा जणू घोषणाच राहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com