चाळीस वर्षानंतर रत्नागिरीत फुलले कमळ

चाळीस वर्षानंतर रत्नागिरीत फुलले कमळ

८७९९५
८७९९६

लोगो
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ

चाळीस वर्षांनी फुलले कमळ
राणे ४७ हजार ८५० मतांनी विजयी ः रत्नागिरी जिल्ह्यात पिछाडी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा ४७ हजार ८५० मतांनी पराभव केला. चाळीस वर्षांनंतर प्रथमच या मतदारसंघात राणेंच्या विजयाच्या रुपाने कमळ फुलले; परंतु बालेकिल्ला असलेली शिवसेना येथे प्रायशः रत्नागिरीत पाय रोऊन असल्याचे निवडणुकीतून स्पष्ट झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मिळालेल्या मताधिक्यानेच राणेंना तारले. त्या जोरावर त्यांनी रत्नागिरीतल राऊत यांच्या मताधिक्यावर मात करीत दणदणीत विजयी मिळवत गुलाल उधळला.
सकाळी आठ वाजता एमआयडीसीच्या एफसीआय गोदामात पोस्टल मताने मतमोजणी सुरू झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्टल मते विनायक राऊत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोस्टल मते नारायण राणे यांच्या पारड्यात पडली. पहिल्या फेरीने विनायक राऊत यांनी मताधिक्य घेत सुरुवात केली. त्यामुळे पुढे असाच ट्रेंड राहील, अशी अनेकांची अपेक्षा होती; परंतु दुसऱ्या फेरीतच चित्र पालटले. नारायण राणे यांनी २ हजार ३०५ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा विनायक राऊत यांनी तिसऱ्या फेरीत आघाडी घेतली. चौथ्या फेरीनंतर नारायण राणे यांनी जे मताधिक्य घेतले ते वाढतच राहिले. सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास नारायण राणे मतमोजणी केंद्रावर हजर झाले.
सहाव्या फेरीला राणे यांनी ७ हजार ८१८ मताधिक्य घेतले. त्यानंतर प्रत्येक फेरीला राणे यांना मताधिक्य मिळत गेले. १२ व्या फेरीला तर राणेंनी २३ हजार ४५० मतधिक्य घेतले. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही मतदारसंघातून राणेंना घसघशीत मताधिक्य मिळत गेले. अगदी उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदारसंघात तर विनायक राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. राणे यांना या मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले आहे. सुमारे लाखाच्या घरात राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मताधिक्य मिळाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, लांजा-राजापूर आणि रत्नागिरी या तिन्ही मतदारसंघांत मात्र विनायक राऊत यांना मतदारांनी चांगले मताधिक्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरीत निष्ठावंत शिवसैनिक अजूनही शिवसेनेच्या बाजूने ठाम असल्याचे दिसते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून राणेंना चांगले मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु ९६७८ मताधिक्य महाविकास आघाडीने रत्नागिरीतून घेतले आहे. त्यामुळे महायुती अर्थात सामंत, भाजप येथे कमी पडल्याचे स्पष्ट दिसते. राजापूर विधानसभा मतदारसंघात राऊत यांना सुमारे ३० हजारांच्या दरम्यान मताधिक्याची अपेक्षा होती. तिथेही राणे यांनी चांगली मुसंडी मारत हे मताधिक्य १८ हजारांवर आणले. चिपळूण विधानसभा मतदारंसघात १९ हजार मतांनी विनायक राऊत यांनी आघाडी घेतली.

चौकट
राणे ठाण मांडून
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळणारे मताधिक्य रत्नागिरी जिल्ह्यात राऊत यांना मिळणारे मताधिक्य तोडून राणे पुढे जात होते. त्यामुळे राणेंचा आत्मविश्वास वाढला. ते मतमोजणी केंद्रावर शेवटपर्यंत ठाण मांडून होते. अखेर १५ ते १८ व्या फेरीनंतर राणेंनी विजय आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. ४५ हजारांचे मताधिक्य तोडणे राऊत यांना शक्य नव्हते. त्यामुळे भाजपच्या गोटात जल्लोष सुरू होता. नारायण राणे निवडून आले, हे निश्चित झाल्यानंतर गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला.

राणे विजयी घोषित
२५ व्या फेरीनंतर सायंकाळी साडेचार वाजता नाराणय राणे यांनी ४ लाख ४८ हजार ५१४ मते घेतली, तर विनायक राऊत यांनी ४ लाख ६५७ मते मिळाली. नारायण राणे ४७ हजार ८५८ मतांचे मताधिक्य घेऊन दणदणीत विजयी झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी राणे यांना विजयी उमेदवार म्हणून प्रमाणपत्र दिले.

दृष्टिक्षेपात
११ हजार ६४३ मतदारांची नोटाला पसंती
१५४५ मते अमान्य (रिझेक्ट)

चौकट
उमेदवारनिहाय मिळालेली मते
राजेंद्र आयरे ७८५६
नारायण राणे ४,४८,५१४
विनायक राऊत ४,००,६५६
अशोक पवार ५२८०
मारुती जोशी १०,०३९
सुरेश शिंदे २२४७
अनंत तांबडे ५५८२
विनायक लहु राऊत १५,८२६
शकील सावंत ६३९५

कोट
खासदारकीची पहिल्यांदा निवडणूक लढलो आणि जिंकलो; पण या निवडणुकीच्या निमित्ताने सांगावे वाटते की विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे. सर्वांनी चांगले काम केले म्हणून निवडून आलो. सर्वांचा मी ऋणी आहे. खासदार म्हणून या लोकांच्या विश्वासाला पात्र ठरेन त्यांना अपेक्षित काम करेन.
- नारायण राणे, नवनियुक्त खासदार

कोट
हा निकाल म्हणजे धनशक्तीसमोर जनशक्ती हरली. विरोधकांनी ‘धन’शक्तीचा वारेमाप वापर केला. आम्हाला हा अनपेक्षित निकाल आहे. केंद्रीय मंत्री असतानादेखील धनशक्तीचा वापर करून राणेंना निवडून यावे लागते, हे दुर्दैवी आहे. कोकण का रिकामे झाले, याचा अभ्यास आम्हाला नक्कीच करायला लागणार आहे.
- विनायक राऊत, ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com