वाशीतील धरणाचे काम ५० वर्षांनंतरही अपुरे

वाशीतील धरणाचे काम ५० वर्षांनंतरही अपुरे

वाशीतील धरणाचे काम अद्याप रखडले

ग्रामस्थांची ५० वर्षांनंतरही प्रतीक्षा ; २२ गावांचा प्रश्न कायम, चौथी पिढी करतेय आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ७ : धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी वाशी दशक्रोशी भागातील ग्रामस्थांची अवस्था झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील वाशी गावातील धरण गेल्या पन्नास वर्षात पूर्ण झालेले नाही. या धरणातील पाण्यामुळे २२ गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे तरीही शासन व जलसंपदा विभाग दुर्लक्ष करत आहे. हे धरण पूर्ण होण्यासाठी कृती समिती आता पाठपुरावा करणार असल्याची माहिती संतोष घाग यांनी देवरूख येथे पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आनंद पुरोहित, नारायण सावंत, मनोहर घाग, अविनाश घाग, जलनायक युयुत्सू आर्ते आदींसह वाशी दशक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
गडगडी धरणाला आमदार भाई सावंत, जगन्नाथराव जाधव असताना सुरवात झाली. बाव जलविद्युत प्रकल्प बासनात गुंडाळल्यानंतर गडगडी धरणाला मंजुरी मिळाली. निधी मंजूर झाला व आराखड्याप्रमाणे कामही सुरू झाले. वारंवार खर्चाचे बजेट वाढवले गेले तरीही पन्नास वर्षात धरण काही झाले नाही. मग हा जनतेचा पैसा कुठे गेला, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत, असेही घाग यांनी सांगितले. आता धरणासाठी तिसरी पिढी झटत आहे. चौथी पिढी पाणी पाणी करत आहे. या धरणासाठी दशक्रोशीतील नागरिक एकत्र आले आहेत. जलसंपदा व शासनाच्या विरोधात जलआक्रोश आंदोलन छेडण्याची कृती समितीने तयारी केली होती; मात्र जलसंपदा विभागाने दोन महिन्यात पाहणी करून कामाला सुरवात होईल, असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तरीही धरण पूर्ण करून घेणारच असा निर्धार कृती समितीने केला आहे. या वेळी ग्रामस्थांनी पाण्यावाचून आमचे हाल होत आहेत. पाणी नाही म्हणून पीक नाही. कालव्यासाठी जमिनी घेतलेल्या आहेत. पाणी नसल्याने जनावरेही पाळता येत नाहीत, अशा व्यथा मांडल्या. कृतीसमिती अध्यक्ष संतोष घाग यांनीही या धरणात आपण जलसमाधी घेऊ, असे या वेळी जाहीर केले. या सभेच्या ठिकाणी जमावबंदी आदेश असल्याने पोलिस बंदोबस्त होता.
----
या आहेत मागण्या
धरणाची उंची वाढवू नये
गाळ उपसा करावा
कालव्याऐवजी पाईपलाईन
पाणीपुरवठ्यासाठी जॅकवेल
धरणाचे दरवाजे बदलावेत
विस्थापितांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत
अतिवृष्टीवेळी धरणाचे पाणी सोडू नये
-------
कोट
जलसंपदा विभागाने दोन महिन्यात पाहणी करून धरण बांधकामाला सुरवात न केल्यास सहा महिन्यांनी २६ जानेवारीला ७५व्या वर्षी आपण आत्मदहन करू.
- रवींद्र घाग
----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com