ठाकरे गटाच्या शिवसेनेत बदलाचे वारे

ठाकरे गटाच्या शिवसेनेत बदलाचे वारे

८९०८३
८९०८२

ठाकरे गटात खांदेपालट गीते समर्थकांना धक्का
संजय कदम नवे जिल्हाध्यक्ष : संदीप सावंतांना डच्चू, जितेंद्र चव्हाण तालुकाध्यक्ष
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ : कोकणातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेने गमावल्यानंतर संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना पदावरून हटवले आहे. सचिन कदम यांच्या जागी माजी आमदार संजय कदम यांची तर संदीप सावंत यांच्याऐवजी आमदार भास्कर जाधव यांचे समर्थक जितेंद्र पप्या चव्हाण यांची निवड मातोश्रीवरून करण्यात आली आहे.
माजी खासदार अनंत गीते समर्थकांना बाजूला करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात उत्तर रत्नागिरी भागातील शिवसेनेत अनंत गीते यांची संघटनेवरील पकड कमी होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा तब्बल ४७ हजार मतांनी पराभव झाला. रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनंत गीते मोठ्या फरकाने पराभूत झाले असले तरी उत्तर रत्नागिरी भागातून त्यांना ३७ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यांना मताधिक्य मिळवून देण्यात दापोलीचे माजी आमदार संजय कदम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात मेहनत घेतली. त्याची पोचपावती म्हणून त्यांना उत्तर रत्नागिरी भागाचे जिल्हाध्यक्षपद दिले आहे. गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधव व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी अनंत गीते यांना मताधिक्य दिले. त्याची पोचपावती म्हणून रामपूर येथील जितेंद्र ऊर्फ पप्या चव्हाण यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड केली. विशेष म्हणजे अनंत गीते समर्थक सचिन कदम आणि संदीप सावंत यांना हटवून त्या ठिकाणी नव्या नियुक्त्या झाल्या आहेत. हा अनंत गीते यांना पक्षांतर्गत धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले असले तरी विधानसभा निवडणुकीत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळावे यासाठी स्थानिक पातळीवर बदल केले आहेत. मावळते जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून गीते यांचा पराभव झाल्यानंतर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र त्याला कुठेही दुजोरा दिला गेला नाही. कदम घरगुती कारणामुळे व्यस्त आहेत. संदीप सावंत यांची मात्र उचलबांगडी करण्यात आली आहे.


उत्तर रत्नागिरी भागातून आम्ही अनंत गीते यांना मताधिक्य दिले. आगामी काळात पक्षाची ताकद वाढावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार निवडून यावे यासाठी पक्षाने संघटनात्मक बदल करून मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. या पदाचा उपयोग मी आगामी काळात केवळ संघटना वाढीसाठी करणार आहे.
- संजय कदम, जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी शिवसेना (ठाकरे गट)

मला तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पक्षहितासाठी संघटनेने काही बदल केले आहेत. त्या बदलांचा स्वीकार करून संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जातील. मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन संघटना वाढीसाठी काम करेन.
- जितेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष गुहागर विधानसभा मतदार संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com