जलजीवनच्या ६७ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई

जलजीवनच्या ६७ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई

Published on

‘जलजीवन’च्या ६७ ठेकेदारांना दंड
कीर्तीकिरण पुजार ः योजनांना सप्टेंबर २०२४ ची डेडलाईन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार ४३२ पाणी योजना सुरू आहेत. त्यापैकी ४०० योजना १०० टक्के पूर्ण झाल्या आहेत. १५० योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, ४३२ योजनांचे काम सुधारावे लागणार आहे. या योजना पूर्ण करण्याची डेडलाईन सप्टेंबर २०२४ दिली आहे. योजनांचे काम मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ६७ ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारांना नोटिसा बजावल्या असून, २ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली.
राज्यामध्ये २००२ ते २००९ या कालावधीत शिवकालीन पाणी साठवण योजना राबविली. योजनेंतर्गत उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या असलेल्या गावांमध्ये पावसाचे पाणी साठवणूक करण्याच्या व स्रोत बळकटीकरणाच्या योजना हाती घेण्यात आल्या. या योजनेंतर्गत हाती घेतलेल्या उपाय योजनांद्वारे अनेक गावांच्या उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या यशस्वीपणे सोडविण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गतदेखील स्रोत बळकटीकरण उपाय योजना हाती घेतली; परंतु २०१८ पासून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत या योजनांची (शाश्वतता) अंमलबजावणी केंद्र शासनाद्वारे थांबविली आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जल जीवन मिशन कार्यक्रम (२०२०-२०२४) राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ‘हर घर नल से जल’ या उद्देशाने ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे ५५ लिटर प्रतिदिन, प्रतिव्यक्ती पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.
जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत १ हजार ४३२ योजना राबविण्यात येत आहेत. सुमारे १ हजार १०० कोटींचा हा आराखडा आहे; परंतु अनेक योजनांना जागेची अडचण येत असल्याने सुधारित आराखडा तयार करून पाठवावा लागणार आहे. त्यामुळे हा आराखडा १ हजार ६०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. जलजीवन मिशनमधील ४०० योजना परिपूर्ण झाल्या आहेत. काही झाले तर सप्टेंबर २०२४ पर्यंत सर्व योजनांची कामे पूर्ण करा, असे आदेश जिल्हा परिषद सीईओंनी दिले आहेत.


योजनांबाबत १०५ तक्रारी
३५० योजनांना जागेची अडचण होती. ती स्थानिक पातळीवर सोडविण्याचे आदेश दिले आहेत. विविध योजनांबाबत १०५ तक्रारी आल्या होत्या. त्याची शहानिशा करून ८० टक्के तक्रारी निकाली काढल्या आहेत. या योजनेच्या कामाबद्दल काही तक्रारी असल्यास ०२३५२- ३५०७२७ हा हेल्पलाईन नंबर दिला आहे. तक्रार आल्यास एका तासामध्ये त्याचे निराकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती कीर्तीकिरण पुजार यांनी दिली.

चौकट
राज्य पाणी स्वच्छता मिशन समितीच्या पथताने २ वेळा योजनांची पाहणी केली. रत्नागिरीतील फणसोप आणि हातखंबा, तर गुहागर २, दापोली, चिपळूण प्रत्येक १ कामांची पाहणी केली. जलजीवन मिशनच्या विशेष कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, दापोली अशा १५ कामांना भेट देऊन पाहणी करून काही सुधारणा सुचविल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.