दाखले वेळेत देण्यास प्रशासन कटिबद्ध

दाखले वेळेत देण्यास प्रशासन कटिबद्ध

Published on

दाखले वेळेत देण्यास प्रशासन कटिबद्ध

तहसीलदार वीरसिंग वसावे ः कुडाळात विविधप्रश्नी पत्रकारांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः तहसील कार्यालयातून दिले जाणारे विविध दाखले, कामकाज, जनतेचे प्रश्न या विषयांवर कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे आणि तालुक्यातील पत्रकार यांच्यात चर्चा झाली. यावेळी तालुक्यातील तळागाळातील लाभार्थ्यांना शासकीय योजना तसेच दाखले वेळेत मिळण्यासाठी आम्ही निश्चितच पुढाकार घेऊ, त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे श्री. वसावे यांनी सांगितले.
श्री. वसावे यांनी कुडाळ तालुक्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोकोपयोगी कामे करण्यावर भर दिला आहे. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळणारे दाखले त्यांना वेळेत मिळावेत, यासाठी त्यांनी तीन ग्रामपंचायतस्तरांवर दाखले शिबिरे आयोजित केली. त्याचा विद्यार्थ्यांना आणि पालकांना चांगला फायदा झाला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, म्हणून ‘केवायसी’साठी शिबिरे आयोजित करणे, त्यांच्या शेतापर्यंत जाणे, आजारी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची केवायसी पूर्ण करणे, अशी कामे तहसीलदार वसावे यांनी केली. सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी तालुक्यात मंडलनिहाय शिबिरे आयोजित केली आहेत. त्याचा चांगला फायदा महिलांना होत आहे.
नेहमी नागरिकांना मध्यवर्ती ठेवून काम करणाऱ्या तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आज कुडाळ तालुक्यातील पत्रकारांना आपल्या कार्यालयात चहापानासाठी निमंत्रित करून कुडाळ तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली. लोकांचे प्रश्न समजून घेतले. सध्या मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी अर्ज भरणे सुरू आहे. हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडून भरून घ्यावे, असे आवाहन श्री. वसावे यांनी केले. या योजनेबाबत नागरिकांमध्ये अजून स्पष्टता आलेली नाही. जर एखादी महिला शासनाच्या अन्य योजनांचा लाभ घेत असेल, तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे परिपत्रकात नमूद असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सातबाराबाबतही चर्चा झाली. डिजिटल सातबारामध्ये बऱ्याचदा नावांचा घोळ होतो, ही बाब पत्रकारांनी निदर्शनास आणली. त्यावर श्री. वसावे म्हणाले, ‘‘हस्तलिखित सातबारावर नाव असते ते जर डिजिटल सात बारावर चुकले, तर ते दुरुस्त करता येते; पण हस्तलिखित सातबारावर जर नाव चुकीचे असेल, तर मात्र त्यासाठी कायद्यांतर्गत अपील करावे लागते. शिधापत्रिकेवरील नावे कमी करणे, नोंदी याबातची कामे प्राधान्याने हाती घेतली आहेत. वारस तपासाबाबत प्रलंबित नोंदी पूर्ण करून घेण्याबाबत तलाठ्यांना लवकरच आवश्यकता सूचना देण्यात येतील. पूरपरिस्थितीबाबत आपत्ती व्यवस्थापनाच्या सभेमध्ये सार्वजनिक बांधकाम आणि संबंधित विभागांना सूचना केल्या होत्या. त्याचे त्यांनी पालन करणे आवश्यक आहे. जुन्या आंबेरी पुलावरून पावसात वाहतूक करणे धोकादायक आहे. रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढतो. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना तसे फलक लावण्यात येतील. विजेचीही व्यवस्थाही आवश्यक आहे. तशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊ.’’
यावेळी नायब तहसीलदार प्रतीक आढाव, नायब तहसीलदार संजय गवस, अव्वल कारकून नरेंद्र एडके, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष नीलेश जोशी, रवी गावडे, प्रमोद म्हाडगूत, विलास कुडाळकर, पद्माकर वालावलकर, प्रसाद राणे, गुरू दळवी, रोहन नाईक, हरिश्चंद्र पालव आदी पत्रकार उपस्थित होते.
...............
चौकट
विकासकामांसाठी समन्वय आवश्यक
कुडाळ शहराचा ‘डीपी प्लान’ होणे आवश्यक आहे. जेणेकरून सांडपाण्याची समस्या कमी होईल. विकासकामांत सर्व प्रशासनामध्ये आणि विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे, तरच शहराचा आणि गावाचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो, असे तहसीलदार वसावे यांनी सांगितले.
95147

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.