सावंतवाडीतील गटारांसह नाले साफ करा

सावंतवाडीतील गटारांसह नाले साफ करा

Published on

95932

सावंतवाडीतील गटारांसह नाले साफ करा
व्यापारी संघाची मागणीः मुख्याधिकारी साळुंखे यांच्याशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः तालुक्यात रविवारी (ता. ७) कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी तुंबल्याने व्यापारी वर्गांचे मोठे नुकसान झाले. मात्र, ही परिस्थिती नेमकी कशाने ओढवली, यासाठी पालिका प्रशासनाने बाजारपेठेतील गटारांचा तसेच अन्य तांत्रिक बाबींचा विचार करून आवश्यक ती उपाययोजना राबवावी. शक्यतो बंदिस्त गटार व नाले माणसे उतरून साफ करा, जेणेकरून भविष्यात पुन्हा पाणी तुंबण्याचा प्रकार घडू नये, अशी मागणी आज व्यापारी संघाच्यावतीने मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे करण्यात आली.
शहरात रविवारी दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने पूर्णतः मुख्य बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचले होते. मँगो हॉटेल ते गांधी चौक परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी जाऊन आतील सामानाचेही मोठे नुकसान झाले. अचानक पाणी आल्याने व्यापाऱ्यांना काहीच हालचाली करता आल्या नाहीत. एकूणच ही परिस्थिती नेमकी कशाने ओढवली ? याचा विचार होऊन भविष्यात पुन्हा असे संकट उद्भवू नये यासाठी आज व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी साळुंखे यांची भेट घेतली. यावेळी जगदीश मांजरेकर, आनंद नेवगी, पुंडलिक दळवी, आसिफ बिजली, रंजन रेडकर, दत्ता सावंत, संदेश परब, संतोष मंजु, बाळ बोर्डेकर आदी उपस्थित होते.
शहरातून जाणारा मुख्य नाला हा नरेंद्र डोंगराच्या पायथ्यापासून सुरू होतो. परंतु, हा नाला बहुतेक ठिकाणी बंदिस्तच असल्याने आतमध्ये साचलेला कचरा साफ न झाल्याने पाण्याला अडथळा होतो. त्यामुळे बंदिस्त असलेले नाले तसेच गटारांत माणसे उतरवून यंत्रसामुग्रीद्वारे साफ करण्यात यावे. बऱ्याच ठिकाणी नाल्यात तसेच गटारांमध्ये प्लास्टिक बॉटल्स, कचरा अडकून पडलेला आहे. त्यामुळे पाणी निचरा होण्यास अडथळा होतो. दुसरीकडे शहरातील बांधकाम व्यवसायिकांनी बांधकाम परिसरात टाकलेली वाळू वाहून येऊन ती गटारांमध्ये साचली आहे. ती बाहेर काढून गटर साफ करणे गरजेचे आहे तसेच संबंधित बांधकाम व्यवसायिकांना आवश्यक त्या सूचनाही देणे गरजेचे आहे. तसे झाल्यास बऱ्यापैकी पाणी निचरा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तात्काळ यावर विचार करून उपाययोजना राबवा, असे उपस्थित व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शहरातील गटारांची पाहणी पालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांमार्फत केली आहे. लवकरच आपली मागणी लक्षात घेता बंदिस्त गटार आणि नाले माणसे उतरवून साफ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तशी यंत्रणा आम्ही राबवणार आहोत. जास्तीत जास्त शहरात पुन्हा पाणी तुंबण्याचा प्रकार होऊ नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेणार आहोत, असे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी साळुंखे यांनी दिले.

चौकट
‘महसूल’कडून पंचनामेच नाहीत
शहरातील बाजारपेठेत रविवारी पाणी तुंबून व्यापाऱ्यांच्या दुकानातील सामानांचे मोठे नुकसान झाले. परंतु, दोन दिवस उलटूनही या ठिकाणी महसूलची कुठलीही यंत्रणा पंचनाम्यासाठी आली नाही. याबाबत उपस्थित व्यापाऱ्यांनी आपली नाराजी मुख्याधिकारी यांच्याकडे व्यक्त केली. झालेले नुकसान लक्षात घेता आपण महसूलला याबाबत तात्काळ कल्पना देऊन नुकसानीचा पंचनामा करण्यास सांगा, अशी मागणीही यावेळी व्यापाऱ्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.