जिल्ह्यात ५ वर्षांत मोकाट गुरांमुळे २१ अपघात

जिल्ह्यात ५ वर्षांत मोकाट गुरांमुळे २१ अपघात

Published on

जिल्ह्यात पाच वर्षांत मोकाट गुरांमुळे २१ अपघात

सात जणांचा मृत्यू; जनावरेही दगावली, संरक्षण, संगोपनाचा प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. ९ : गोवंश हत्याप्रकाराचे गंभीर पडसाद जिल्ह्यात उमटले. यावरून मोर्चा निघाला, रास्ता रोको झाले. संशयिताकडून आठ ते दहा जनावरांची सुटका पोलिसांनी केली; परंतु इथे हा प्रश्न संपत नाही. पोलिस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून, जिल्ह्यात गेल्या ५ वर्षांमध्ये जनावरांमुळे २१ अपघात होऊन ७ जणांचा मृत्यू झाला तर ५ जनावरे दगावली असून, ८ जखमी झाली. त्यात मोकाट गुरांचा प्रश्न अजूनही भिजत पडला आहे. मोकाट गुरांची चोरी, बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी अशा गुरांच्या संरक्षण आणि संगोपनाच्यादृष्टीने विचार होण्याची गरज आहे.
शहरात गोवंश हत्या झाल्याचा गंभीर प्रकार पुढे आला. वासराचे मुंडके रस्त्यावर सापडल्यानंतर समाजाच्या भावना दुखवल्याने हिंदु समाज आणि गोरक्षक कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. अतिशय गंभीर आणि क्रूर हा प्रकार आहे. त्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. त्याला अटक करून कडक कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात असे प्रकार होणार नाहीत यासाठी पोलिसदलाने खबरदारी घ्यावी, या मागणीसाठी समाज रस्त्यावर उतरला. मोर्चा काढून मोर्चेकऱ्यांनी रास्तारोको केले. या दरम्यान पोलिसांनी संशयिताला अटक केली. त्याच्या वेतोशी येथील जनावरांच्या गोठ्यावर छापा टाकून ८ गुरांची सुटका करण्यात आली. याबाबत त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल झाला; परंतु हा प्रश्न इथेच संपला असे नाही. जिल्ह्यात मोकाट गुरांची गंभीर समस्या यावरून ऐरणीवर आली आहे. या जनावरांचे करायचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यात अशा मोकाट गुरांमुळे गेल्या ५ वर्षांत २१ अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी आहेत. ५ जणांवर अपघातात दगावली असून ८ जखमी झाली आहेत. गुहागर, खेड, संगमेश्वर, मंडणगड, रत्नागिरी शहर, पूर्णगड, देवरूख, रत्नागिरी ग्रामीण, अलोरे, राजापूर, जयगड, सावर्डे, नाटे या पोलिस ठाण्यात या संदर्भात नोंद असून एकूण ११ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातूनच मोकाट गुरांची चोरी, त्यांची बेकायदेशीर वाहतूक होऊन असे प्रकार घडत आहेत. हे रोखण्यासाठी मोकाट गुरांच्या प्रश्नावर शासकीय यंत्रणेसह सामाजिक संस्था, गोशाळांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे तरच अशा प्रकारांना आळा बसणार आहे.
-----------
कोट
गेल्या पाच वर्षांमध्ये मोकाट गुरांमुळे अनेक अपघात झाले आहेत. हा प्रश्न हाताळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. गुरांचे संगोपन झाल्यास अनेक प्रश्न सुटतील.

-धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.