रत्नागिरी - प्रकल्पांचे स्वागत केले तरच बाहेर जाणारे लोंढे थांबतील

रत्नागिरी - प्रकल्पांचे स्वागत केले तरच बाहेर जाणारे लोंढे थांबतील

Published on

प्रकल्पांचे स्वागत केले तरच
बाहेर जाणारे लोंढे थांबतील

उदय सामंत ः दोन्ही प्रकल्प प्रदूषणविरहित, मोठी रोजगारनिर्मिती

रत्नागिरी, ता. ५ : रत्नागिरीत येणारे दोन्ही मोठे प्रकल्प प्रदूषणविरहित आहेत. या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. स्थानिकांनी या प्रकल्पांचे स्वागत केले, तरच मुंबई-पुण्याला जाणारे बेरोजगारांचे लोंढे थांबणार असून, जिल्ह्याची आर्थिक उन्नती होईल, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, ‘सिलिकॉन वेफर्स आणि चिप्सच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या वेल्लोर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर हा देशाच्या संरक्षण विभागाशी संबंधित हा प्रकल्प आहे. कुशल, अकुशल अशा सुमारे ३८ हजार जणांना यातून रोजगार मिळणार आहे. स्थानिकांचा नोकरीसाठी मुंबई, पुण्याला जाणारा लोंढा थांबवा, त्यांना इथेच रोजगार मिळवा यासाठी हे मोठे उद्योग आणले आहेत.
कोकण म्हटले की, प्रकल्पांना विरोध, असाच समज उद्योजकांमध्ये झालेला आहे. त्यामुळे विनाप्रदूषण प्रकल्प आणतानाही आपल्याला तारेवरची कसरत करावी लागली आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आपण विशेषत: आभार मानतो. वेल्लोर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व रिलायन्स इन्फ्रासाठी त्यांनी पाठिंबा दिला. प्रकल्प परराज्यात विशेषत: गुजरातला जात असल्याची टीका करण्यात येत होती; मात्र खूप मोठी गुंतवणूक रत्नागिरीत होत आहे. हे दोन प्रकल्प येण्यापूर्वी किमान दहा ते पंधरा हजार जणांना रोजगार मिळेल, असे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होतात.
वेल्लोर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी झाडगाव एमआयडीसीतील स्टरलाईटची ४०० एकर जागा आणि रिळ-उंडीतील जागा देण्यात येणार आहे. तीन वर्षांत प्रकल्प बांधून पूर्ण होईल व उद्योगाला सुरुवात होणार आहे. या तीन वर्षांत स्थानिक कारागिरांच्या हाताला काम मिळणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.
डिफेन्स क्लस्टरमध्ये रिलायन्स इन्फ्रा ही कंपनी धीरूभाई अंबानींच्या नावाने संरक्षकविषयक प्रकल्प उभारत आहे. हा १० हजार कोटींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला कॅबिनेटच्या एका कमिटीची परवानगी मिळाली की तिचा मार्ग येत्या चार-पाच दिवसांत मोकळा होईल, असे त्यांनी सांगितले.
--------------------------
चौकट

वेल्लोर-टाटा लवकरच टायअप
सध्या तरुणाई मुंबईकडे जात आहे. या तरुणांनी आता रत्नागिरीतच थांबले पाहिजे. आयटीआय, टाटा ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून या उद्योगांसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी वेल्लोर कंपनी व टाटाचे लवकरच टायअप होणार असून, त्यातील प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना उद्योगांमध्ये रोजगार मिळणार आहे, असे सामंत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com