रत्नागिरी ः साहित्यिकांनी प्रखर राष्ट्रप्रेमाने भारलेले लेखन करावे

रत्नागिरी ः साहित्यिकांनी प्रखर राष्ट्रप्रेमाने भारलेले लेखन करावे

Published on

26204

साहित्यिकांनी प्रखर राष्ट्रप्रेमाने भारलेले लेखन करावे
उदय निरगुडकर; कोमसापतर्फे वार्षिक पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ः समाजामध्ये घडणाऱ्या निराशात्मक बाबींवर मात करण्यासाठी आणि देशाच्या संदर्भाने देशप्रेमाने भारलेली पिढी निर्माण करण्यासाठी समाजात लिहिणाऱ्या साहित्यिकांनी प्रखर राष्ट्रवादाने भारलेले साहित्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वार्षिक वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार वितरण सोहळा मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात झाला त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, साहित्यिकांना अनेक संस्था पुरस्कार देत असतात; मात्र कोकण मराठी साहित्य परिषदेने दिलेला पुरस्कार म्हणजे आईने आपल्या बाळाला भरवलेल्या प्रसादाच्या घासाचा शिधासमान आहे. त्यामुळे या पुरस्काराचे महत्व अनन्यसाधारण असून, हा पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीमत्वांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान होत आहे. ही बाब सर्व साहित्यिक आयुष्यातील सगळ्यात मोठी घटना आहे. समाजामध्ये चंगळवाद मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून आज प्रत्येकाने स्वतःपुरते न बघता राष्ट्राचा विचार केला पाहिजे. यासाठी साहित्यिकांनी समाजातील सर्वांनाच आपल्याकडे खेचून राष्ट्रप्रेम त्यांच्यात निर्माण होईल, अशी रचना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.
ज्येष्ठ साहित्यिक सुरेश जोशी यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ साहित्यिकांच्या कार्याचा गौरव करत अभिनंदन केले तर केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी कोमसापच्या वाटचालीचा संक्षिप्त आढावा घेतला व परिषद नेहमीच नवोदित लेखकांना प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी ज्या हेतूने कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन केली तो हेतू आज कोकणात सर्वत्र साहित्य चळवळ पाहून साध्य झाल्याचे वाटते. त्यामुळे सर्वांनी मिळून कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्य उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे आणि स्वागत कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी केले.
या वेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, प्रकाश दळवी, अशोक ठाकूर, प्रा. एल. बी. पाटील, उषा परब, जयू भाटकर, नलिनी खेर, दीपा ठाणेकर, मधुकर टिळेकर उपस्थित होते. 

चौकट
मान्यवर परीक्षकांकडून परीक्षण
कोमसाप आणि कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे त्यांनी कौतुक केले. कोमसापतर्फे दरवर्षी कोकणातील लिहित्या साहित्यिकांना प्रेरणा मिळावी यासाठी प्रस्ताव मागवले जातात. त्यानुसार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या पुस्तकांवर मान्यवर परीक्षकांकडून परीक्षण केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com