

49166
सिंधुदुर्गात उष्म्याचा कहर
पारा ४० अंशांजवळ ः आंबा, काजू मोहोराला मोठा फटका
एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ४ ः सिंधुदुर्गात तापमानवाढीचा कहर दिवसागणिक वाढतच असून, सलग चार दिवस ३९ अंश सेल्सियस उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या चटक्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. आंबा, काजूचा दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील मोहोर पूर्णतः करपला आहे. त्यामुळे दोन्ही पिकांवरील संकट अधिकच गडद झाले असून उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्याला यावर्षी पावसाने झोडपून काढले. त्यानंतर चार-पाच वर्षांच्या तुलनेत थंडीचा कडाका वाढल्याचे चित्र होते. दहा अंश सेल्सियसपर्यंत नीचांकी तापमानाची नोंद यावर्षी अनेकदा झाली; परंतु पावसाळा, हिवाळ्याप्रमाणे उन्हाळ्याची दाहकता यावर्षी फेब्रुवारीपासूनच सुरू झाली आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होते. तापमान १५ मार्चनंतर वाढत जाते; परंतु यावर्षी ४ फेब्रुवारीपासून तापमान वाढ होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता तापमान ३७ अंश सेल्सियसपेक्षा जास्त राहिले आहे. दिवसागणिक त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. १ मार्चपासून तर तापमानवाढीचा कहर झाला आहे. सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात ३९ ते ३९.५ अंश सेल्सियस इतके तापमान राहिले आहे. जिल्ह्याच्या काही भागात यापेक्षाही अधिक तापमान असण्याचा अंदाज आहे.
तापमानवाढीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. उन्हाच्या झळा सहन करण्यापलीकडे आहेत. अंगाची लाही लाही होत असून घामाच्या धारा वाहत आहेत. दुपारी १२ वाजल्यानंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतीसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना काम करणे अडचणीचे होत आहे.
तापमानवाढीचा मोठा तडाखा आंबा, काजू पिकांना बसला आहे. जिल्ह्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आलेला मोहोर पूर्णतः करपला आहे. काजू पिकाची तर दयनीय अवस्था झाली आहे. दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यांतील मोहोरापासून शेतकऱ्यांना ५ ते १० टक्के उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे काजू उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अजूनही अपेक्षित काजू हंगाम जिल्ह्यात सुरू झालेला नाही. दोडामार्ग, बांदा, सावंतवाडीत धीम्या गतीने काजू हंगाम सुरू आहे. आंब्याचा मोहोरदेखील अनेक भागांत करपून गेला आहे. त्यामुळे नियमित हंगामापुढेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आंबा, काजू बागायतदारांमध्ये आतापासूनच चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्चमध्ये उन्हाच्या कडाक्याने नागरिक हैराण झाले आहेत. मार्चमध्ये इतके तापमान आहे तर एप्रिल, मेमध्ये उन्हाचा कडाका किती असेल आणि तो सोसता येईल का, असा प्रश्न आतापासून नागरिकांना पडला आहे. उन्हाच्या झळा वाढताच कुलर, एसीच्या विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या गर्दीत अधिकच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पावसाचा अंदाज
जिल्ह्यात उष्णतेचा कहर झाला असताना हवामान विभागाने ५ मार्चला पावसाचा अंदाज दिला आहे. जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायततदारांची धास्ती वाढली आहे.
संशोधन केंद्रावरील तापमान नोंद
तारीख फोंडाघाट मुळदे रामेश्वर (देवगड) अंश सेल्सियसमध्ये
१ मार्च * ३९.५ * ३८ * ३७
२ मार्च *३९ * ३८ *३७
३ मार्च *३९.५ * ३७.५ * ३७.५
४ मार्च *३९ * ३८ * ३७.५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.