रत्नागिरी विमानतळासाठी 247 कोटी
रत्नागिरी विमानतळासाठी २४७ कोटी
अर्थसंकल्पात घोषणा; टर्मिनल बिल्डिंगसाठीची तयारी पूर्ण
रत्नागिरी, ता. १० ः राज्याच्या अर्थसंकल्पात रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी २४७ कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याची सभागृहात घोषणा केली. यातून टर्मिनस बिल्डिंगसह खासगी प्रवासी वाहतुकीच्यादृष्टीने विमानतळावर आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे लवकर हा विमानतळ सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रत्नागिरी विमानतळ येथून प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी आवश्यक निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उभारणीच्या कामाला गती आणि त्या लवकरच पूर्ण करण्याकडे कार्यवाही होणार आहे. रत्नागिरीतील मिरजोळे गावातील रत्नागिरी विमानतळ हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एमआयडीसी मालकीचे होते. आता ते पाळत ठेवण्यासाठी आणि शोध आणि बचावकार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे स्टेशन म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीद्वारे (एमएडीसी) आता ३२०० चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या नवीन पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, लिंक टॅक्सीचे आणि दोन एटीआर-७२ प्रकारची विमाने हाताळण्यास सक्षम एप्रनसह एक नवीन नागरी एन्क्लेव्ह विकसित केले जात आहे.
विमानतळासाठी आणखी १७ एकर जमीन संपादित करण्यात आली. अनेकदा ढगाळ वातावरण असेल तर वैमानिक धोका न पत्करता लॅंडिग टाळतो आणि नियोजित विमानतळाऐवजी अन्य जवळच्या विमानतळावर सुरक्षित विमाने उतरवली जातात. कोकणात पावसाळ्यात अनेकवेळा ढगाळ वातावरण असते अशावेळी विमान लॅंडिंग किंवा उड्डाणाला त्याचा फटका बसत असतो. हे टाळण्यासाठी रत्नागिरी विमानतळावरच व्हीओआरडीएम ही यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे विमानतळावरील दृश्यमानता वाढणार असून, वैमानिकाला विमान सुरक्षितपणे उतरवता येणार आहे. या विमानतळासाठी २७ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात आले. आणखी १७ एकर जागा घेण्याची प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी येथून प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या ट्रमिनल बिल्डिंगच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. २०२५-२६ या अर्थसंकल्पात रत्नागिरी विमानतळासाठी २४७ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे विमानतळ खासगी प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे.
---------
चौकट...
विमानतळावर डी-व्हीओआर यंत्रणा
रत्नागिरी विमानतळावर आता ढगाळ वातावरणातही विमान सुरक्षित लॅंडिंग (उतरणे) होणे आता सोपे होणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक डॉफलर व्हेरिपाय ओमनीरेंज (डी-व्हीओआर) ही यंत्रणा रत्नागिरी विमानतळावर बसवण्यात येणार आहे.
------
चौकट
जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या घोषणा
- संगमेश्वर तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी तरतूद
- जिल्ह्यात १०० खाटांचे संदर्भ सेवा अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करण्यावर भर दिला जाणार
- कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून ५४.७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेणार. यातून मराठवाड्यातील सुमारे २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. या प्रकल्पाचे सर्वेक्षण व अन्वेषणाचे काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

